गोमंतकीय लोक अत्यंत भावभोळे आहेत. इथल्या वातावरणातच भक्तिरस भरलेला आहे. इथल्या देव देवता, त्यांची मंदिरे, त्याचे वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गोमन्तकाचे काही खास उत्सव राजमान्यता मिळवलेले आहेत. उदा. सत्तरी आणि डिचोली तालुक्याची घोडे मोडणी, साळचे गडे, शिवोलीचा वीरभद्र, काणकोणचा शीर रान्नी उत्सव, जाम्बावलीचा गुलालोत्सव, शिरगावची लईराईची जत्रा आणि या जत्रेत रचलेल्या धगधगत्या अग्नीतून धावत जाण्याची प्रथा-परंपरा, अंत्रुज महालाचा शिगमोत्सव, नार्वेची अष्टमीची जत्रा, दर वर्षी ३ डिसेंबर रोजी होणारे गोंयच्या सायबाचे फेस्त इत्यादी इत्यादी ! याशिवाय गावागावातून होणार्या ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रा आणि वर्धापन दिवस यांची रेलचेल असते.
या सर्वच उत्सवांना प्रचंड गर्दी होत असते. या प्रत्येक ठिकाणी नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होते तशीच या ठिकाणी हवशे, नवशे आणि गवशे हेही गर्दी करीत असतात. या गर्दीवर कुणाचे नियंत्रण राहत नाही कारण शिस्त नावाची चीज आम्हा सर्वसामान्य भारतीयांच्या रक्तातच नाही. अपवाद मिझोरम राज्य ! बाकी सर्वत्र मनमानी कारभार. शिस्त लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला शहाणपणा शिकवला जातो. मंदिराचे (Temples) पुजारी, देवालय समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्य हे उत्सवाच्या दिवशी अनभिषिक्त राजे असतात. राजसत्ता देखील त्यांच्यापुढे मान तुकवते मग इतरांची काय कथा ! मात्र अशा प्रसंगी काही अघटित घडले की ही सगळी मंडळी नामानिराळी राहते आणि त्याचा सारा दोष प्रशासनावर आणि विशेषतः पोलीस यंत्रणेवर ठेवला जातो व त्यांना बळीचा बकरा बनवले जाते.
शिरगाव डिचोली (Bicholim) या गावातील सुप्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेत दुर्दैवी अपघात घडला आणि एकच हलकल्लोळ माजला. या अपघाताची कारणमीमांसा करायची झाली तर या जत्रेतील आयोजन समितीकडे बोट दाखवता येईल. मात्र आयोजन समितीच याला सर्वस्वी जबाबदार आहे असे म्हणणे योग्य होणार नाही. याचे कारण म्हणजे जत्रा म्हटली की तिथे भाविकांची गर्दी होतेच! त्यातच पूजेचे साहित्य विकणारे, मिठाईची दुकाने थाटणारे, खाद्यपदार्थ विकणारे, लहान मुलांची खेळणी विकणारे यांची दाटी झालेली असते.
अशातच देव दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी लोक आपला अग्रक्रम लावण्यासाठी धडपडत असतात. यातून ढकलाढकली होते, बाचाबाची होते. प्रसंगी मारामारी देखील होण्याची शक्यता असते. जत्रेच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग अरुंद असेल तर अशा ठिकाणी चेंगराचेंगरी वाढते. लाखोंच्या संख्येने लोकांची गर्दी आणि या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी हजार बाराशे पोलिस हे व्यस्त प्रमाण! बरे, या पोलिसांना गर्दी आवरण्यासाठी आपल्या बळाचा वापर करता येतो का? तर नाही. कारण तसे केले तर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असते. बेशिस्त वागणार्या कुणा एखाद्याला पोलिसाने समजा दंडुक्याचा प्रसाद दिलाच आणि ती व्यक्ती मंत्र्याच्या जवळची निघाली तर तो मोठा विषय होतो.
शिरगाव इथे झालेल्या चेंगराचेंगरीत माणसे एकमेकावर पडली आणि या अपघातात सात माणसे दगावली तर सत्तरहून अधिक जखमी झाली. त्यातील अजूनही काही गंभीर अवस्थेत आहेत असे कळते. रात्री तीन साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी तत्परतेने जखमी लोकांना इस्पितळात पोहोचविण्याची आणि आपल्या वरिष्ठांना या अपघाताची माहिती देण्याची कामगिरी बजावली. ही बातमी समजताच राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे तत्परतेने अपघातस्थळी धावून आले आणि यंत्रणेला आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या. गोवा मेडिकल कॉलेज, डिचोली आणि म्हापसा येथील इस्पितळ इथे जखमींना हलवण्यात आले. तिथल्या सर्व कर्मचार्यांनी या जखमी लोकांच्यावर लगोलग उपचार सुरू केले आणि अनेकांचे प्राण वाचवले. या प्रसंगी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी दाखविलेली तत्परता वाखाणण्याजोगी होती.
बसस्थानकावर, रेल्वे स्थानकावर माणसे बेकाबू होतात. कुणाचा पायपोस कुणाच्या ताब्यात नसतो. सर्वांनाच घाई झालेली असते. सरकारतर्फे काही मोफत योजना असेल, सार्वजनिक ठिकाणी भोजन व्यवस्था असेल तिथेही अशीच गर्दी केली जाते. यातून असे अपघात घडत असतात. स्वयं शिस्त जेव्हा अंगवळणी पडेल तेव्हाच असे अपघात टळतील! ख्रिस्ती बांधव आणि मुस्लीम बांधव यांच्या प्रर्थानास्थळी असे अपघात सहसा घडत नाहीत याचे कारण तिथे शांतपणे रांग लावली जाते. तिथली शिस्तबद्धता आणि शांतता वाखाणण्याजोगी असते. आम्ही हिंदू बांधव हे कधी शिकणार आहोत?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.