वाळपई: सत्तरीवासीय सुसंस्कृत आणि स्वाभिमानी असून कोणत्याही व्यक्तीने अपमानास्पद विधान केल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा देत सत्तरीतील नागरिकांनी वाळपई पोलिस स्थानकात राजदीप नाईक यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली. तीन दिवसांच्या आत सत्तरीत येऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी राजदीप नाईक यांनी केलेल्या एका विधानात सत्तरीतील ‘४५ हजार गुरे’ असा उल्लेख केल्याने सत्तरीवासीयांच्या भावना दुखावल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. याविरोधात बुधवारी दुपारी मोठ्या संख्येने नागरिक वाळपई
पोलिस स्थानकाबाहेर जमले होते. त्यांनी पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शनिवार, २८ रोजीपर्यंत राजदीप नाईक यांनी सत्तरीत येऊन सर्वांसमोर जाहीर माफी मागावी. तसे न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल. पोलिस निरीक्षकांनी उपस्थितांना आश्वासन दिले की, या प्रकरणात पोलिस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील.
जनतेचा स्वाभिमान दुखावणारे वक्तव्य
सत्तरीच्या जनतेचा स्वाभिमान दुखावणारे वक्तव्य केल्यामुळे, संपूर्ण तालुक्यात राजदीप नाईक यांच्या नाटकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘कलाकाराने समाजाचे प्रबोधन करणे अपेक्षित असताना, त्यांनी जनतेचा अनादर केला आहे. त्यामुळे सत्तरीत कोणत्याही गावात त्यांच्या नाटकाचे आयोजन करू नये; तसा प्रयत्न झाल्यास जनता ती नाटके बंद पाडेल,’ असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.