पणजी: पर्वरी येथील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या ५.५ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचा अंतिम सेगमेंट शनिवारी यशस्वीपणे बसविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. प्रकल्पांतर्गत ८८ खांब, ८७ स्पॅन आणि तब्बल १,४३१ सेगमेंटची उभारणी करण्यात आली आहे. अंतिम स्पॅनची जोडणी पूर्ण झाल्याने पुलाच्या बांधकामातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
सुमारे ६४१ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पणजी, पर्वरी, म्हापसा आणि पेडणे यादरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. विशेषतः पर्वरी परिसरात दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा उड्डाणपूल प्रभावी ठरणार आहे. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
तसेच इंधन बचत, प्रदूषणात घट आणि वाहतुकीची कार्यक्षमता वाढण्यास हातभार लागणार आहे. सध्या पुलावरील उर्वरित तांत्रिक कामे, सुरक्षा उपाययोजना, रस्त्याचे डांबरीकरण, चिन्हांकन आणि अंतिम तपासण्या सुरू असून सप्टेंबरमध्ये हा उड्डाणपूल जनतेसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.