पणजी: पर्वरी येथील नव्या उड्डाणपुलावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सरकारने वाहतूक सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उड्डाणपुलावर दुचाकींना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी जाहीर केला. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
उड्डाणपुलावर वाहनांचा वेग नियंत्रित राहावा यासाठी ६५ किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी ‘इंटरसेप्टिंग रडार’ बसवण्यात आला आहे. तसेच, लवकरच ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आणि अन्य सुरक्षा साधने बसवण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले. अपघाताची कारणे लक्षात घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, याच परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने चुकून ‘अटल सेतू’कडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेश केला. पुढे दुचाकींना प्रवेशबंदी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक झाली. यात दुचाकीचे नुकसान झाले. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. उड्डाणपुलावरील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी दुचाकींवरील प्रवेशबंदी, वेगनियंत्रण आणि ‘सीसीटीव्ही’सह विविध उपाययोजना करण्यात येत असल्याने या मार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
...तोच नियम पर्वरीत
‘अटल सेतू’ वाहतुकीस खुला झाल्यानंतर तेथूनही दुचाकींना मज्जाव करण्यात आला होता. आता पर्वरी उन्नत मार्गावरही तोच नियम लागू केला आहे. ज्यामुळे अपघात टळतील, अशी उपाययोजना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.