पणजी: पोर्तुगीजांनी एक हजारांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा आणि या सर्वांचे मिळून एकच स्मारक मंदिर उभारण्याची शिफारस करणारा अहवाल यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीने सरकारला सादर करून दीड वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला, तरी सरकारी पातळीवरून याबाबत अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. तसेच स्मारक मंदिरासाठी सरकारला जागाही मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.
उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीबाबत सरकारने स्थापन केलेल्या समितीने आलेल्या अर्जांनुसार संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून आणि अवशेष तपासून एक हजारांपेक्षा अधिक मंदिरे पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केल्याचा अहवाल सादर केला.
शिवाय या सर्व मंदिरांचे मिळून एकच स्मारक मंदिर उभारण्याची शिफारसही सरकारला केली होती. पोर्तुगिजांनी तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या तीन तालुक्यांतील सर्वाधिक मंदिरे उद्धवस्त केली होती. त्यामुळे स्मारक मंदिर या तीनपैकी एका तालुक्यात उभारण्यात यावे, असेही या समितीने अहवालात नमूद केले होते.
त्यानंतर समितीच्या या शिफारशीबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असे पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दीड वर्षांआधी स्पष्ट केले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी सरकारने यासाठी वेर्णा परिसरात सरकारी जागेचा शोध सुरू केला होता. पण, तो शोधही लवकरच थांबला. त्यानंतर आत्तापर्यंत सरकारने दुसरी जागा शोधलेली नाही, अशी माहिती सरकारी सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
दरम्यान, गोव्यावर सुमारे साडेचारशे वर्षे राज्य केलेल्या पोर्तुगिजांनी गोव्यातील संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक हिंदू-देवतांची मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे चर्च उभारले. त्यामुळे हिंदू धर्मीयांना आपले देव घेऊन मूळ जागा सोडाव्या लागल्या. त्यात स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.