पणजी: सांत आंद्रे मतदारसंघातील सुमारे ३० लोकांनी सोमवारी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांची भेट घेऊन नेवरा येथील प्रस्तावित रेल्वे स्थानक प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली.
यावेळी काँग्रेस नेते युरी आलेमाव यांनी त्यांना या बाबत आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना व इतर संबंधितांना पत्र लिहणार असल्याचे आश्वासन दिले.
नेवरा व मांडूर येथील स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करताना त्यांच्या खाजन शेतीवर कसा परिणाम होईल त्या बाबत सांगितले.
‘‘नेवरा येथील प्रस्तावित कोकण रेल्वे स्थानका संदर्भातील लोकांचा विरोध मी केंद्र सरकारला पत्र लिहून कळविणार आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील खाजन जमीन आणि या भागातील जलस्त्रोतांचे आपण रक्षण केले पाहिजे. त्यांचा आवाज ऐकला जावा आणि आमच्या गोव्याची पर्यावरणीय अखंडता जपून त्यांचे प्रश्न सोडवले जावेत यासाठी मी प्रयत्न करणार,’’ असे आलेमाव म्हणाले.
या प्रस्तावावर आपला तीव्र आक्षेप आहे, कारण यामुळे सुपीक शेतजमीन असलेल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील खजान जमिनीचे कधीही भरून न येणारे नुकसान तर होईलच, शिवाय जलस्त्रोतांचेही नुकसान होईल, असे नेवरा आणि मांडूर येथील रहिवाशांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
‘‘वेळ्ळी मतदारसंघातील प्रस्तावीत सां जुझे दी आरियल येथील रेल्वे स्थानक आणि नेवरा येथील रेल्वे स्थानकासंदर्भात मी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. प्रस्तावित क्षेत्राजवळ आधीच रेल्वे स्थानके आहेत आणि म्हणूनच कोळसा वाहतुकीसाठी हे केले जात असल्याची चिंता लोकांनी व्यक्त केली आहे,’’ असे युरी आलेमाव म्हणाले.
स्थानिकांची संमती नसताना आणि ग्रामसभेत स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात ठराव घेतला असताना सरकारने असे प्रकल्प पुढे नेउ नयेत, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.