पर्वरी: पर्वरी आणि पणजीला जोडणारा जुना मांडवी पूल सध्या अंधारात बुडाला आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे एलईडी दिवे बंद पडल्याने, इथून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होतेय. पर्वरी आणि बेती या भागांमधून पणजीला ये-जा करणाऱ्यांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे, मात्र अंधारामुळे आता तो धोकादायक बनलाय.
या पुलावर वाहनांचा वेग खूप जास्त असतो, अनेकदा गाड्या रेस लावल्यासारख्या चालवल्या जातात. त्यातच आता अंधारामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पुलावर लावलेल्या विजेच्या खांबांवर सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत, त्यामुळे अपघात झाल्यास पोलिसांना पुरावे गोळा करण्यात आणि दोषी कोण हे ठरवणं कठीण झालं आहे.
स्थानिक लोकं मासेमारीसाठी पुलावर जागा अडवून बसतात, त्यामुळे पुलाचा बराच भाग व्यापला जातो. काही दिवसांपूर्वी इथे एका स्कूटरची दुसऱ्या एका दुचाकीला धडक झाली होती आणि अपघातानंतर तुटलेले भाग अजूनही पुलावरच पडलेले आहेत, यामुळे इथे अपघातांचा धोका वाढलाय.
"पुलावरचे दिवे तातडीने दुरुस्त करावेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत," अशी मागणी प्रवासी करत आहेत. "अंधारामुळे रात्री प्रवास करणे खूप धोकादायक झाले आहे. गाड्या वेगाने चालतात आणि अपघात झाल्यास कोणाला जबाबदार धरायचे हे कळत नाही," असे एका प्रवाशाने सांगितले.
पुलावरील एलईडी दिवे बंद पडल्यामुळे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अभावामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. हा पूल पर्वरी आणि पणजीला जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने त्याची सुरक्षितता राखणे अत्यंत गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.