National Green Tribunal : पणजीतील बंदर कप्तान खात्याच्या धक्क्यावर बांधण्यात येणाऱ्या टर्मिनल इमारतीचे काम बंद ठेवण्याचा आदेश देऊन राष्ट्रीय हरित लवादाने सरकारला दणका दिला आहे. परंतु लवादाने पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल (ईआयएसी) तयार करण्याचा आदेश दिला असून ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे स्पष्टीकरण बंदर कप्तान खात्याकडून देण्यात आले.
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए) यांच्याकडून ना हरकत दाखला घेण्याची सूचना केली आहे. ईआयएसी अहवाल आल्यानंतर हा दाखला द्यायचा की नाही, असे आदेश स्पष्ट केले. पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी किमान सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागतो. परंतु माहिती उपलब्ध असल्यास ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करता येते. दोनापावल येथील समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) पणजीतील किनारी भागांवर संशोधन केले असून त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध आहे. या माहितीचा वापर करून हा अहवाल तयार केला जाऊ शकतो.
काम रखडण्याचा धोका
सध्या पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तयार करण्याचे कंत्राट मुंबई येथील आदित्य पर्यावरण कंपनीला दिली आहे, अशी माहिती बंदर कप्तान खात्याचे सागरी अभियंता आणि जहाज सर्वेक्षक ऑक्टाव्हीयो रॉड्रिग्स यांनी दिली. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशामुळे टर्मिनल इमारतीचे काम दीर्घ काळासाठी खोळंबणार, अशी भीती निर्माण झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.