तिसवाडी: गोव्यात नव्याने तीन रेल्वे स्थानक होणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर होणाऱ्या या नव्या स्थानकांमुळे प्रवाशांना फायदा होणार असला तरी या प्रस्तावित रेल्वे स्थानकांना राज्यातून विरोध होत आहे. रविवार (दि. २३ फेब्रुवारी) रोजी नेवरा ग्रामसभेने या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध केला. सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी देखील स्थनिकांची मागणी उचलून धरत केंद्र सरकारच्या नियोजित रेल्वे स्थानक प्रकल्पाला विरोध केला आहे.
आमदार विरेश बोरकर यांच्या म्हणण्यानुसार, सरकारला सामान्य जनतेची चिंता नाही. लोकांच्या इच्छा विचारात न घेता सरकार निर्णय घेतं किंबहुना निर्णय लोंकांवर लादला जातो आणि म्हणून अशा प्रकल्पांना विरोध केला जातोय. रविवारी नेवरा ग्रामसभेत देखील सर्व उपस्थितांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचं विरेश यांनी सांगितलं.
एका बाजूने सरकार पर्यावरणाला वाचवण्याच्या गोष्टी करतंय तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे प्रकल्प राबवून याच पर्यावरणाची हानी पोहोचवली जात आहे. करमळी रेल्वेस्थानक केवळ किलोमीटरच्या अंतरावर असताना आणखीन एका रेल्वे प्रकल्पाची आवश्यकता नाही. नेवरा ही जागा खजान शेतीसाठी ओळखली जाते आणि म्हणून इथून होणारी कोळशाची वाहतूक आणि रेल्वेचा प्रकल्प याला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.
गोवा राज्य सरकारने स्थानिकांना त्यांच्या समस्य मांडायची संधी दिली आहे आणि त्याप्रमाणे विरेश बोरकर तसेच पंचायतीकडून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रकल्पाला का विरोध केला जातोय याची करणं स्पष्ट करणारे पत्र पाठवण्यात आले आहे. सरकारने वेळीच जर का स्थानिकांची मागणी मान्य केली तर ठीक नाही तर आम्हाला रस्त्यावर येत आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील बोरकर यांनी दिलाय आणि हा प्रस्तावित प्रकल्प थांबण्याची मागणी केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी गोव्यात नेवरा, सारझोरा आणि मये या ठिकाणी तीन नवीन रेल्वे स्थानक जाहीर करण्यात आली आहेत. नव्या रेल्वे स्थानकांना सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी विरोध दर्शवला. स्थानिकांचा विरोध होत असताना नव्याने स्थानक उभारण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल आपचे आमदार सिल्वा यांनी उपस्थित केला. तसेच, जे हवं ते देण्याऐवजी नको ते का माथी मारले जात आहे, असेही सिल्वा म्हणाले. शिवाय कोळसा वाहतूक आणि इतर प्रदूषण संबधित वस्तूंच्या वाहतुकीची शंका त्यांनी उपस्थित केली, मात्र या प्रश्नांवर बोलताना गोव्यात कोकण रेल्वेच्या मार्गावरुन कोळसा वाहतूक होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.