पणजी: ऋतूमानानुसार बाजारात दाखल होणाऱ्या पावसाळी रानभाज्या दाखल झाल्या असून बांबूचे कोंब, कारल्यासारखी दिसणारी, परंतु आकाराने लहान असलेली फागले, कुर्डू, तायकिळा, अळू आणि इतर भाज्या बाजारात स्थानिक महिला विकत असून या भाज्यांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आणि पावसातच मिळत असल्याने शहरी भागातील नागरिक त्या विकत घेत रानभाज्यांचा आस्वाद घेत आहेत. बांबूचे कोंब आकाराप्रमाणे १०० ते २५० रुपये प्रती नग दराने विकले जात आहेत. फागले १६० रुपये किलो, तर कुर्डूची भाजी ५० रुपयांना तीन ते चार मोळी दराने विकली जात आहे.
कांदे बटाट्याचे दर स्थिर
रानभाज्यासोबतच बाजारात इतर भाज्यांना देखील चांगली मागणी असून कांदे, बटाटे व इतर भाज्यांचे दर आठवड्याभरापासून स्थिर आहेत. टॉमेटो प्रती किलो ५० रुपये दराने विकले जात आहेत. कोथंबिरीची जुडी ४० रुपये, तर पावसाळ्यात देखील वाढत्या उष्म्यामुळे लिंबूचे दर वाढलेलेच आहेत. एक लिंबू ५ रुपयांना विकला जात आहे.
नारळाचे वाढलेले दर काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मध्यम आकाराचा एक नारळ ४० ते ५० रुपये दराने विकला जात आहे. आले ३०० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहे. त्यासोबतच बाजारात फळांचे दर देखील वाढले आहे. सफरचंद २८० ते ३५० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत. मोसंबी २०० रुपये, केळी ८० रुपये डझन दराने विकली जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.