Mumbai Goa Highway
रत्नागिरी: मुंबई - गोवा महामार्गाचे काम गेल्या १४ वर्षापासून रखडले आहे. सरकारकडून वारंवार यासाठी नवीन डेडलाईन दिली जात आहे. पावसाळ्यात महामार्गाची दुरावस्था झाली असताना आता कोकणाला जोडणाऱ्या या महामार्गावरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
अविनाश जाधव यांनी कशेडी (कशेळी) बोगाद्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. "हजारो कोटी खर्च केल्यानंतरही देखील आमच्या कशेळी भोगद्यामध्ये लाईट नाही.हे सरकार आणखी किती कोकणी माणसाचे जीव घेणार आहे?", असा सवाल जावध यांनी उपस्थित केला आहे.
गावी कोकणात जाऊन माघारी ठाण्याच्या दिशेने येताना अविनाश जाधव यांनी कशेडी बोगद्याजवळ रात्री बाराच्या सुमारास हा व्हिडिओ चित्रित केला आहे.
"कशेडीच्या बोगद्यात दोन मोठे बोगदे बांधण्यात आले असून, त्या दोन्ही बोगद्यात लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. दोन्ही बोगद्यात खूप अंधार आहे. अशा परिस्थितीत बोगद्यात एखाद्या वाहनाचा किती मोठा अपघात होऊ शकतो? गेल्या १८ ते २० वर्षापासून या महामार्गाचे काम सुरु आहे. या काळात विविध अपघातात अनेकांना त्यांचा जीव गमावलाय, कोणाचे हात, कोणाचे पाय तुटलेत," असे जाधव म्हणाले.
जाधव यांनी समृद्धी महामार्गावरील इगतपूरी येथे असणाऱ्या बोगद्याचे देखील उदाहरण दिले. "इगतपूरी येथील बोगद्यात मोठ्या प्रमाणावर लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. पण, कोकणातील रस्ते, बोगद्यांची अवस्था भयावह आहे. जोपर्यंत कोणी मरणार नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही. हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे," असे आवाहन देखील जाधव यांनी केले.
"कोकणातील लोकांना अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल तर, सरकाचा निषेध आहे," असे अविनाश जाधव म्हणाले. कोकणात सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असून, यात रस्त्याची आणि बोगद्याची अवस्था अधिक दयनीय झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.