मडगाव: गोव्यात अमली पदार्थांचा विळखा किनारपट्टी भागांपासून ते अंतर्गत गावांपर्यंत तसेच शाळांपर्यंत पोहोचला आहे. राज्यात अमली पदार्थांचा विळखा वाढत असतानाच सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.
गोव्यात अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येबाबत आपण अनेकदा गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ३ सप्टेंबर २०२२, ९ ऑक्टोबर २०२२ तसेच २१ व २२ जुलै २०२५ आणि ६ ऑगस्ट २०२५ रोजी विधानसभेत तसेच विधानसभेबाहेरही या विषयावर आपण अनेकदा सरकारला प्रश्न विचारले. या गंभीर समस्येविरोधात आवाज उठवला; मात्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सरदेसाई म्हणाले की, राज्यातील किनारपट्टी भागांपासून ते अंतर्गत गावांपर्यंत आणि अगदी शाळांमध्येही अमली पदार्थांचे जाळे वेगाने पसरत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. यावरून युवकांचे भविष्य धोक्यात येत असून, लोकांकडून त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गोवा हा अमली पदार्थांचा केंद्रबिंदू बनू देणार नाही, अशी ठाम भूमिका आपण घेतली आहे. गोव्याच्या युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना अमली पदार्थांच्या जाळ्यांना संरक्षण देणे किती काळ चालणार, या प्रश्नाचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे. अमली पदार्थांच्या समस्येवर सरकारने त्वरित कठोर कारवाई करावी व ही समस्या गोव्यातून हद्दपार करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.