कळंगुट: मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात घडविणाऱ्या चालकांविरुद्ध यापुढे थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी स्वागत केले. या निर्णयामुळे वाढत्या अपघातांना आळा बसेल आणि कायद्याचा धाक निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कळंगुट येथे आयोजित पत्रकार परिषदेत लोबो म्हणाले की, वाहतूक विभागाच्या नव्या निर्देशांनुसार मोटार वाहन कायद्यातील कलम १८५, २०२, २०३ आणि २०४ अंतर्गत मद्यपी चालकांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल केला जाणार आहे. यामुळे दोषींवर त्वरित कारवाई होऊन न्यायप्रक्रिया अधिक प्रभावी ठरेल.
या नियमांची पोलिसांनी कठोर अंमलबजावणी करावी आणि राज्यभर जनजागृती करावी. लोबो यांनी बेकायदा रेंट-अ-कार व्यवसायावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक खासगी वाहनमालक पांढऱ्या क्रमांकाच्या गाड्या बेकायदेशीरपणे पर्यटकांना भाड्याने देत असल्याने कायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकारांना पोलिसांच्या दुर्लक्षामुळे खतपाणी मिळत असल्याचे सांगत अशा वाहनांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. राज्यात कायदेशीर रेंट-अ-कार व रेंट-अ-बाईकपेक्षा बेकायदा वाहनांची संख्या अधिक असल्याचा दावा करत, लोकप्रतिनिधींनी मतांची पर्वा न करता या प्रकारांविरोधात पुढाकार घ्यावा, असे आवाहन लोबो यांनी केले.
नगरपालिका लादू नये, पंचायत व्यवस्थाच ठेवावी!
कळंगुटच्या शहरीकरणाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना नगरपालिका लादू नये, पंचायत व्यवस्थाच कायम ठेवावी आणि शहरी वर्गीकरणामुळे स्थानिकांना विकासासह ‘सीआरझेड’ नियमांमध्येही लाभ मिळेल, असे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.