बार्देश: गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे म्हापशात भयानक स्थिती निर्माण झाली. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. दुचाकी, चारचाकी वाहने बुडाली. जुन्या आझिलो इस्पितळाजवळ तळ्याचे स्वरूप येऊन अनेक दुचाकी बंद पडल्या. या प्रकाराबाबत अनेकांनी पालिकेवर टीका केलीच शिवाय स्थानिक आमदारांवरही रोष व्यक्त केला.
पालिकेकडून एप्रिल महिन्यात मान्सूनपूर्व कामासाठी निविदा काढल्या, पण वेळेवर साफसफाई न झाल्याने गटारे तुंबली. विशेष म्हणजे खोर्ली फुकटनगरी येथे महादेव मंदिर ते खोर्ली उसापकर दरम्यान म्हापसा बोडगेश्वर ते तार नदी पात्राजवळच्या मुख्य गटाराची साफसफाई करण्यात आली नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने उपाययोजना करण्यात आली नसल्याने खोर्ली - म्हापसा जंक्शनवर पाणी भरले.
कंत्राटदारांना वेळेवर बिले दिली जात नसल्याने कंत्राटदार निविदेपासून मुद्दामहून दूर राहिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात आले. खोर्ली - म्हापसा भागात डोंगराळ भागातील सर्व पाणी नाल्यातून खाली आले त्या प्रवाहाबरोबर नाल्यांत आणि त्याला जोडलेल्या पाइपमध्ये कचरा अडकला. त्यामुळे खोर्ली भागात पूर येऊन नाल्यातील गटाराचे पाणी येथील लोकवस्तीत शिरले. यामुळे घरातील वीज उपकरणे, टीव्ही आदी सामानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अलंकार थिएटर येथील गटार साफ न केल्याने सर्व पाणी रस्त्याच्या बाजूच्या घरांत शिरले व घरातील वस्तूंचे नुकसान झाले. म्हापसा मिलाग्रीस फेस्तसाठी आलेल्या फेरीतील सोफा, लाकडी अलिशान सामान पूर्णतः भिजून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आंगण, अन्साभाट आदी भागातील घरांतही पाणी शिरून नुकसान झाले.
शहरात विविध ठिकाणी नाले सफाईची कामे सुरू असताना अवेळी पडलेल्या पावसामुळे अशी स्थिती निर्माण झाली. विविध प्रभागात हीच स्थिती आहे. भविष्यात अशी स्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, आता नाले सफाईसाठी नगरपालिकेतर्फे कामगार देण्यात आले आहेत. तसेच यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी दिली.
आमदार ज्योसुआ डिसोझा केवळ राजकारण करतात. काल त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, पण ही वेळ आहे काय? इतके दिवस झोपी गेले होते का? असा सवाल माजी उपनगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी केला.
मान्सूनपूर्व कामे यापूर्वीच सुरू व्हायला हवी होती. पावसाळा जवळ आला की पालिकेला जाग येते, अशी प्रतिक्रिया नगरसेविका अन्वी अमेय कोरगावकर यांनी व्यक्त केली.
म्हापशात पूरस्थिती निर्माण झाली याकडे उपजिल्हाधिकारीही लक्ष देत नाही, असा आरोप नगरसेवक ॲड. शशांक नार्वेकर यांनी केला.
मान्सूनपूर्व पावसातच म्हापशात पूरस्थिती निर्माण झाली. याचा दोष फक्त लोकप्रतिनिधींना देऊन उपयोग नाही. कारण जे मतदार पुन्हा पुन्हा या लोकांना निवडून देतात तेच या परिस्थितीला कारणीभूत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केली.
पालिका अधिकाऱ्यांचे सामान्य जनतेकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.