
म्हापसा: मान्सूनपूर्व पावसाने म्हापसा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मंगळवारी पडलेल्या जोरदार पावसात खोर्ली-म्हापसा उसपकर जंक्शनवर नदीचे स्वरूप आले होते. रस्त्यावरील हा जलप्रलय पाहून स्थानिक नागरिक पालिका व सरकारबद्दल संतप्त भावना व्यक्त होत होत्या. अनेकजण म्हणत होते, काय पाणी, काय गटार, काय नाले, काय रस्ते, सगळंच कसे ओरिजनल, इंटरनॅशनल लेवलचे होय.
या जंक्शनवर दरवर्षी पूरसदृश स्थितीची परंपरा अखंडित चालू आहे. पालिकेसह प्रशासनाची अकार्यक्षमता, उदासीनता, लोकप्रतिनिधींचा सोईस्कर डोळेझाकपणा व लोकांची मानसिकता आदी कारणे या अखंडित पूरसदृश परंपरेला चालवीत आहेत.
‘नेमेचि येतो मग पावसाळा...मग उसपकर जंक्शनवर भरतो पूरसदृशाचा मेळा’ ही वर्षानुवर्षे नागरिकांच्या अंगवळणी पडलेली बाब झाली आहे. मग सगळा दोष हा पावसावर ढकलून पालिका व प्रशासकीय यंत्रणा नामानिराळी होते. हे चित्र कधी बदलणार हे माहिती नाही, परंतु काही कठोर पावले उचलल्यास ही स्थिती बदलू शकते.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसावेळी येथील नाला तुंबल्याने खोर्ली-म्हापसा येथील उसपकर जंक्शनवरील चारही मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. याच पाण्यात एक व्यक्ती स्कूटरसह वाहून गेल्याचे दिसून आले. सुदैवाने त्याला काही झाले नाही, कारण काही अंतरावर जाऊन तो स्थिरावला. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाळी पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहण्यास कारण स्थानिक प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे करण्यात दिरंगाई केल्याचा हा फटका असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
खोर्ली परिसरातील पाच प्रभाग येतात, जे उसपकर जंक्शनवरील या मुख्य नाल्याला जोडतात. हा नाला जलस्रोत खात्याच्या कार्यक्षेत्रात मोडतो. जलस्रोत खात्याकडून हा नाला उपसण्याचे काम अद्याप केलेले नाही.
कारण, निविदेची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळते. अवकाळी पावसाचा फटका इतका जबरदस्त होता की, डोंगरावरून वाहून आलेल्या पाण्याने अक्षरशः या जंक्शनवर पूरसदृश परिस्थिती आल्याचा आभास झाला.
स्कूटरचालक वाहून जाण्याचा व्हिडिओ असो किंवा दोन महिला तोल जाऊन पाण्यास पडतानाचा दुसरा व्हिडिओ असो, याची राष्ट्रीय माध्यमांनी देखील दखल घेतली. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात येते. राष्ट्रीय माध्यमांवर गोव्याची ही स्थिती झळकल्याने, येथील प्रशासकीय कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.
खोर्ली परिसरातील नाल्याची वेळेत साफसफाई होणे गरजेची असते. परंतु, जलस्रोत विभाग असो किंवा म्हापसा पालिकेकडून या नालेसफाईचा पाठपुरावा वेळेत होत नसतो. परिणामी, अशाप्रकारे नाला भरून ओसंडून पाणी प्रवाहाचा जोत वाहतो आणि पाणी रस्त्यावर येण्यापासून दुसरा पर्याय राहत नाही. याचा फटका येथील स्थानिकांसह या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांना होतो. पावसाचे चिखलमय पाणी थेट लोकांच्या घरात शिरते.
या जंक्शनवरील नाल्याशेजारीच काही बांधकामे आहेत. तर एका बांधकामाची वाट (एक्सेस) या नाल्यावरुन बांधण्यात आली आहे. परिणामी, नाल्याचे पाणी व या वाटेच्या काँक्रिटमध्ये जास्त अंतर नाही. तसेच डोंगरावरून वाहून आलेली मोठ्या प्रमाणात माती व चिखल या नाल्यात साचला आहे. परंतु हा गाळ उपसा झालेला नाही. त्यामुळे पाण्याला जाण्यासाठी मोकळी वाट नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाहाला जागा नसल्याने हे पाणी थेट रस्त्यावर येण्यास एक कारण आहे.
मध्यंतरी, जंक्शनवरील नाल्याचे नूतनीकरण करून खाली सिमेंट कॉक्रीटकरण (बेतो) करून सपाटीकरण करण्यात आले होते. त्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या झिरपण्याची स्थिती राहिली नाही. परिणामी, पाणी मोठ्या प्रमाणात डोंगराळ भागातून येते, ते व्यवस्थितरीत्या पुढे प्रवाहित होत नाही किंबहुना पावसाळी पाण्याला जाण्यासाठी मोकळी वाट भेटत नाही. हा संपूर्ण नाल सफाई होणे गरजेचे आहे. कारण, केवळ एकाच ठिकाणचा गाळ उपसा करून प्रश्न सुटणार नाही. या नाल्याची खोली वाढविणे आवश्यक आहे.
काहीजण नारळाच्या झावळ्या, झाडांच्या फांद्या व बागेतील कचरा नाल्यात फेकतात. तसेच रिकामी प्लास्टिक बाटल्या, जुन्या गाद्या, खाली बॅरल्स वगैरे या नाल्यात टाकत असल्याने पावसाळ्यात हा कचरा वाहत सखल भागात येऊन तुंबतो. त्यामुळे पाण्याची वाट अडवली जाते. तेच पाणी नंतर रस्त्यावरून वाहते, परिणामी या जंक्शनवर पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळते.
या नाल्याच्या खाली पाइप आहेत. त्यामुळे या वाहिन्या इतरत्र स्थलांतर करणे आवश्यक आहे. परंतु, अद्याप हे काम झालेले नाही. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला पुरेशी जागा नसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.