पणजी: मळा तलावातील हजारो मासे अचानक मृतावस्थेत आढळले असून आता ते कुजल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. शनिवारपेक्षा रविवारी मृत माशांची संख्या अधिक दिसून आली. त्यामुळे हे मृत मासे त्वरित हटवावेत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
त्यावर ‘तलावातील मृत मासे गोळा करून त्यांची तत्काळ विल्हेवाट लावावी आणि त्याचा अहवाल मंडळाकडे सादर करावा’, असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. मारुतीगडाच्या पायथ्याला असलेल्या पोर्तुगीजकालीन तलावातील हजारो बारीक-मोठे मासे अचानक मृतावस्थेत आढळले आहेत.
तलावात असणारे पाणी साचून राहिलेले आहे. त्याचबरोबर तलावात कदाचित सांडपाणी येत असावे, त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी झाला असेल आणि त्याचा परिणाम माशांवर होऊन ते मृत पडले असावेत, असे प्रथमदर्शनी दिसते. जिलेटिन स्फोट केला तरी त्याची व्याप्ती काही मीटर असते. त्यामुळे स्फोटाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मरू शकत नाहीत.
-बबन इंगोले, मुख्य शास्त्रज्ञ ( निवृत्त) एनआयओ गोवा.
ऑक्सिजन कमी झाल्याने मासे मृत
स्थानिकांच्या मते, शुक्रवारी काही लोकांनी तलावातून मासे पकडून नेले होते; पण शनिवारी सायंकाळी अचानक मृत मासे पाण्यावर तरंगू लागले. पाण्यामधील ऑक्सिजन कमी झाल्याने मासे मृत झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तलावातील दूषित झालेले पाणी खाडीत सोडले नसल्याने पाणी साचून राहते. त्यामुळेही पाण्यातील ऑक्सिजन कमी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
सांडपाण्यामुळे प्रदूषण
मासे मृतावस्थेत अधिक काळ राहिल्याने आता त्यांची दुर्गंधी येऊ लागली आहे. मळा तलावातील पाणीही प्रदूषित झाले असून, त्याचा वापर कोणत्याही कारणासाठी होत नाही. पाण्यात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषण वाढल्याचे येथील रहिवाशांचे मत आहे.
परिसरातील मुले म्हणतात, ‘बॉम्ब ब्लास्टिंग हुआ...
मळ्यातील तलावातील मोठ्या प्रमाणात मासे मृत पावले आहेत, त्यामागील नेमके कारण काय हे अद्यापि स्पष्ट होत नाही. उलट प्रदूषण मंडळानेच महानगरपालिकेला मृत माशांची विल्हेवाट लावावी आणि या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे पत्र पाठविले आहे.
परंतु घटनास्थळावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. या परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लहान मुले जे सांगतात, त्यात नक्कीच तथ्य असावे. त्यातील एक लहानगा सांगतो, ‘बॉम्ब ब्लास्टिंग हुआ पुरा मछली मर गया‘. अशाचप्रकारची प्रतिक्रिया याच परिसरातील सूर्लकर नामक व्यक्तीने प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यामुळे जिलेटिनचा स्फोट झाला की आणखी कशाचा? हे समजून येत नाही. जिलेटिनचा स्फोट झाला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मासळी मेली नसती, असेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.