मडगाव: १५ जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक सुरू होणार असून त्याकाळात गाड्यांची गती नेहमीपेक्षा कमी ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय संपूर्ण रेल मार्गावर कर्मचाऱ्यांकडून २४ तास गस्त घातली जाणार असून त्यासाठी ६३६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तैनात केली जाणार आहे.
पावसात कोकण रेल्वे मार्गावर कित्येकवेळा दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे रेल्वे महामंडळाने आवश्यक ती सुरक्षेची उपाययोजना हाती घेतली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. ज्या ठिकाणी पाणी वाहून जाण्याची गटारे आहेत ती साफ करण्यात आलेली असून जिथे दरडी कोसळू शकतात तिथे आवश्यक ते उपाय घेतले आहेत.
जर मुसळधार पाऊस पडल्यास गाडीची गती प्रती तास ४० किलोमीटरपर्यंत खाली आणण्याच्या सूचना चालकांना केलेल्या असून जर पाण्याची पातळी वाढली, तर ती कमी होईपर्यंत गाड्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाटेत दरड कोसळली तर ती हटवण्यासाठी कणकवली व वेर्णा येथे एस्कवेटर्स ठेवलेले डबे सज्ज ठेवले असून रेल दुरुस्तीसाठी रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ व उडुपी येथे आरएमव्ही डबे ठेवले असून तातडीच्यावेळी मदत मिळावी यासाठी मडगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी आणि कारवार येथे टॉवर ठेवलेल्या गाड्या ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आपत्तीच्या वेळी वैद्यकीय मदत लागल्यास ती त्वरित प्राप्त व्हावी यासाठी ऑपरेशन थिएटरने सज्ज असलेल्या मेडिकल व्हॅन्स रत्नागिरी आणि वेर्णा येथे तैनात करण्यात येणार असून प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर संपर्क यंत्रणेची सोय उपलब्ध असेल, अशी माहिती घाटगे यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.