डिचोली: ‘भाटकार’शाही असलेली १९७१ पूर्वीची घरे नियमित करा, असा ठराव कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अलिकडेच तसे जाहीर केले आहे. याकडे नरेश मांद्रेकर आणि इतर ग्रामस्थांनी लक्ष वेधून ही मागणी केली. या ठरावाची कार्यवाही करण्यात येईल, असे पंचायतीने स्पष्ट केले.
तन्वी सावंत यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने काळजीवाहू सरपंच दिव्या नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज (रविवारी) कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा झाली. पंचायत सचिव महादेव नाईक यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केल्यानंतर ग्रामसभेला सुरवात झाली. या ग्रामसभेत वादविवाद झाला नसला, तरी कचऱ्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला.
पंचायतीने वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या ‘जाळी’ आड कचरा टाकण्याचा प्रकार चालूच आहे. याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. मात्र यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यावा, असे सांगून पंचायतीने वेळमारून नेली. बेकायदा बांधकामे आणि अन्य काही विषयावर गरमागरम चर्चा झाली. विजय मठकर, वासंती सालेलकर आदी ग्रामस्थांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.
या ग्रामसभेला दिव्या नाईक यांच्यासह उज्वला कवळेकर, ज्ञानेश्वर बालो, लक्ष्मण गुरव, योगेश पेडणेकर आणि दामोदर गुरव हे सहा पंचसदस्य उपस्थित होते. तर तन्वी सावंत, दत्तप्रसाद खारकांडे, बीबी आयेशा, बिंदिया सावंत आणि सुकांती खारकांडे, हे पाच पंचसदस्य अनुपस्थित होते. या ग्रामसभेला ३० च्या आसपास ग्रामस्थ उपस्थित होते. दिव्या नाईक यांनी आभार मानले. दुपारी बारा वाजेपर्यंत ही ग्रामसभा आटोपली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.