म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, हे तुरुंग नसून सराईत गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे ‘हॉलिडे होम’ बनले आहे.
गंभीर गुन्ह्यांतील शिक्षाप्राप्त तसेच अंडरट्रायल कैद्यांना आत सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात असून, राजकीय नेते आणि पोलीस प्रशासनाच्या कथित संगनमतामुळे कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे धाब्यावर बसली आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेश कामत यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना केली.
कामत म्हणाले की, तुरुंगातील पोलीस यंत्रणा आणि अधिकारी भीतीपोटी किंवा पैशांच्या हव्यासापोटी गुन्हेगारांसमोर गुडघे टेकताना दिसत आहेत. केवळ पगार आणि वरच्या कमाईच्या नादात संपूर्ण ‘सिस्टम’ भ्रष्ट झाली आहे. याचा थेट परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होत असून, प्रामाणिक आणि कायदा पाळणारा सर्वसामान्य नागरिक आज भीतीच्या सावटाखाली जगत आहे.
कामत म्हणाले की, काही तुरुंगाधिकारी प्रामाणिकपणे काम करत असतील; पण भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्यांची गळचेपी होत असावी. तुरुंगात मोबाईल फोन किंवा अमली पदार्थ सापडतात, हे आपण नेहमीच बातम्यांमध्ये वाचत असतो.
उपाययोजना आवश्यक
कामत म्हणाले की, सध्या या कारागृहातूनच गुन्हेगारीचे जाळे आणि खंडणीचे धंदे मोकळेपणाने चालवले जात आहेत. ‘तुरुंगाबाहेर पडल्यानंतर आपल्याला कोण सांभाळणार?’ या भीतीने तेथे तैनात पोलीस कर्मचारी कैद्यांच्या मर्जीनुसार वागत असल्याचे चित्र आहे.
हे गैरप्रकार वेळीच थांबवायचे असतील, तर सरकारने तातडीने कठोर उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. अन्यथा, गुन्हेगारांचे हे मोकाट कुरण कधीच बंद होणार नाही. त्यासाठी ही संपूर्ण भ्रष्ट व्यवस्था मुळापासून साफ करण्याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.