पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने काहीशी ताठर भूमिका घेत शुक्रवारी दुसरी चौदा जणांची यादी जाहीर केली. वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्षेतील काँग्रेसला अजूनी युतीची आशा आहे. परंतु प्रत्यक्षात युती संकल्पनेचा फज्जा उडाल्यात जमा आहे.
‘काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे गोव्यात दाखल न झाल्याने युतीचा निर्णय एक दिवस पुढे ढकलला आहे. ठाकरे हे गोव्यात येणार होते मात्र ते , शनिवारी दाखल होतील. त्यांच्या उपस्थितीत ते युतीचा निर्णय जाहीर करतील’, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
‘आरजीपीच्या नेत्यांकडून कितीही टीका झाली तरी जनतेला युती व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे काँग्रेस युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणार आहे’, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, ‘आरजीपी’चे प्रमुख मनोज परब हे युतीवर काही बोलले नसले तरी आमदार वीरेश बोरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘निवडणूक जवळ आली असताना काँग्रेसचे युतीविषयी उद्या निर्णय घेऊ, हेच सुरू आहे.
आम्ही युतीसाठी कधीपर्यंत वाट पहायची? आम्ही उमेदवार का जाहीर केले, अशाप्रकारचा निर्णय आम्हाला का घ्यावा लागला? याची माहिती आम्ही प्रसारमाध्यमांना लवकरच देऊ’, असेही बोरकर म्हणाले.
‘इंडिगो‘च्या विमानफेऱ्या रद्द झाल्याने देशभरात देशांतर्गत विमानसेवेवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे दिसले. त्याचा फटका काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनाही बसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड-आरजी युतीवर ते बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार होते. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही कालच ही माहिती दिली होती. परंतु ठाकरे आज गोव्यात न दाखल झाल्याने ते उद्या, शनिवारी गोव्यात येणार असून, युतीवर ते निर्णय जाहीर करतील असे पाटकरांना सांगावे लागले.
आरजीपीने दुसरी यादी जाहीर करताना तुमच्याशी चर्चा झाली होती काय, यावर आपल्याकडे तरी त्याविषयी चर्चा झाली नाही. पक्षातील कोणाशी त्यांची चर्चा झाली असेल तर आपणास माहीत नाही.
आम्ही कोणाचाही विश्वासघात केलेला नाही, आरजी जे आरोप करीत असतील तर त्यांना ते विचारावे असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले. ज्या ठिकाणी आमदार आहेत, तेथील जागा काँग्रेस कसा सोडले, असे सांगत ते पुढे म्हणाले, ज्या जागांवर वाद आहे, त्यावर प्रभारींसमोर चर्चा होऊन निर्णय होईल, असेही त्यांनी नमूद केले.
पाटकर म्हणाले, तिन्ही पक्ष एकत्र येत असतील, तर ज्या जागेवर, ज्या पक्षाचा जिल्हा पंचायत सदस्य निवडून आलेला आहे, ती जागा इतर पक्षाला कसे कोण सोडेल? काँग्रेस हा जुना पक्ष आहे, जेव्हा युती करण्याचा निर्णय झाला.
तेव्हा आम्ही एक पाऊल मागे घेतला आणि पुढे पाऊल टाकले. ज्या २२ जागा जाहीर केल्या आहेत, त्या काँग्रेसच्या आहेत. ज्या जागा जाहीर झालेल्या नाहीत, त्या युतीतील पक्षांसाठी ठेवल्या आहेत. त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे, आम्ही शेवटपर्यंत एकत्रित येऊन युतीसह पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
१.काँग्रेस भवनात शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांनी पाटकर यांनी गाठले. त्यानंतर पाटकर म्हणाले, आत्तापर्यंत काँग्रेसने ज्या जागांवरील उमेदवार जाहीर केलेले आहेत, ते कोणत्याही वादात नसलेल्या जागा आहेत.
२.सांताक्रुझच्या जागेवर काँग्रेसची अधिकृत निवडून आलेली जिल्हा पंचायत सदस्य आहे. ती जागा नैसर्गिकरित्या काँग्रेसची आहे, मग ती जागा काँग्रेस कशी सोडेल? हा साधा प्रश्न आहे.
३.ज्या ठिकाणी काँग्रेसचा दावा नाही, त्याठिकाणी इतर पक्षांनी उभ्या केलेल्या उमेदवारांविषयी काहीही आक्षेप नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रित यावे, असे जनतेला वाटत आहे.
४. आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील आहोत. आम्ही ज्या जागांविषयी इतर पक्षांकडे बोलणे सुरू आहे, त्या जागा आम्ही जाहीर केलेल्या नाहीत. त्यांनी त्याठिकाणी उमेदवार जाहीर केले असतील तर त्याविषयी त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असेही पाटकर यांनी सांगितले.
५.आम्ही उद्या, शनिवारी आरजीबरोबर युतीचा शेवटचा प्रयत्न करणार आहोत, नाहीतर उद्या दुपारपर्यंत आमचा गोवा फॉरवर्डबरोबर झालेल्या चर्चेअंती उर्वरित जागांवरील उमेदवार जाहीर करणार आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.