पणजी : येत्या शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज राज्य हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात १ जूनपासून ११ सप्टेंबरपर्यंत राज्यात तब्बल ११६ इंच पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पावसाचे प्रमाण या काळात १११.३१ इंच इतके असते. त्यामुळे यंदाचा पाऊस सरासरीच्या तुलनेत ४.२ टक्क्यांनी अधिक असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मान्सून सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सलग अनेक दिवस मुसळधार पावसाने राज्यातील जनजीवन विस्कळीत केले होते. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र, मागील आठवड्यापासून अधूनमधून सरी कोसळू लागल्या आहेत. आता पुन्हा एकदा तीन दिवस सातत्याने मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कारण पावसामुळे पाणी साचणे, वाहतूक कोंडी होणे तसेच वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. पर्यटन हंगामाची चाहूल लागलेल्या गोव्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पावसाचा या हालचालींवरही काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, असे पर्यटन व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारने नागरिकांना आवश्यक तेथे प्रवास करताना खबरदारी घेण्याचे तसेच हवामान विभागाच्या सूचना नियमितपणे तपासण्याचे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे, पावसाळी साहित्याचा वापर करणे, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील फिरस्ती टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.