पणजी: आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींना राज्य सरकारने मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य प्रोत्साहन योजनेंतर्गत शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा राज्यातील विविध आयटीआयमध्ये ४४६ मुलींनी प्रवेश घेतला, तर २४०५ मुलांनी प्रवेश घेतला आहे.
आयटीआयमध्ये प्रामुख्याने मुलांची संख्या अधिक असते. आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत जात असल्याचे माहिती आयटीआय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आजकाल इंजिनियरिंग किंवा इतर प्रोफेशनल अभ्यासक्रमांना एआयचा धोका निर्माण झाला असल्याने या अभ्यासक्रमांपेक्षा कौशल्य आधारित अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढत आहे.
कारण कौशल्य आधारित मनुष्यबळाची आवश्यकता कायम राहणार आहे. कौशल्याच्या माध्यमातून नोकरी आणि स्वतंत्र व्यवसाय देखील करता येतो. त्यामुळे तरुणाई आयटीआयकडे वळत आहे. इयत्ता आठवीपासून पदवीधर झालेले विद्यार्थी देखील आता आयटीआयमध्ये प्रवेश घेत आहेत.
८ जुलैपासून दुसरी फेरी
राज्यातील विविध आयटीआयमधील कौशल्य आधारित अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी दुसरी फेरी ८ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत होणार असून ज्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आधारित अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करावेत. मुलींना शुल्क माफ असल्याने त्यांनीही मोठ्या प्रमाणात विविध अभ्यासक्रमांत प्रवेश घ्यावेत, असे आवाहन कौशल्य विकास संचालनालयाने केले आहे.
राज्यात १३ आयटीआय केंद्रे
आयटीआयमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रीशन, वायरमॅन, प्लंबर, फिटर आदी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. न्यू एज कॉर्स जसे की, ड्रोन पायलट, कोपा, फायर तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, कचरा व्यवस्थापन, ई-वाहनसंबंधी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांकडे देखील विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मुख्यमंत्री अप्रेंटीशीप योजनेंतर्गत आयटीआयचे १२ हजार ७९० कौशल्य पदवीधर कार्यरत. एआय आधारित प्रयोगशाळा मडगाव आणि पेडणे येथे कार्यरत आहेत. राज्यात सरकारी १० आणि खासगी ३ आयटीआय कार्यरत आहेत.
पूर्वी इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जायचे. आयटीआयकडे दुय्यम नजरेने पाहिले जायचे, परंतु आता कल बदलत चालला असून कौशल्य आधारित अभ्यासक्रमांत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
- शीतल देसाई, साहाय्यक संचालक
अनामत रक्कम भरावी लागणार
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेणाऱ्या सर्व महिला उमेदवारांना शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, वार्षिक तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कुटुंबे तसेच अनाथ व निराधार विद्यार्थ्यांनाच शिक्षण शुल्कात सवलत मिळत होती. नव्या योजनेअंतर्गत केवळ शिक्षण शुल्क माफ करण्यात आले असून, परत मिळणारी अनामत रक्कम प्रवेशावेळी भरावी लागणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ही रक्कम विद्यार्थिनींना परत केली जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.