पणजी: मागील दोन आठवड्यांपासून राज्यात पालेभाज्यांचे दर भडकलेलेच असून टोमॅटोने साठी गाठलेली आहे. ऐन नाताळ आणि वर्षअखेरीस दराचा भडका उडालेला आहे.
कांदा आणि बटाटा प्रतिकिलो ४० रुपयांनी आणि पालेभाज्या २० ते ३० रुपये प्रतिजुडी दराने विकल्या जात आहेत. ऐन नाताळात आणि वाढलेल्या थंडीमुळे अंड्यांना मागणी वाढली असून प्रतिडझन १०० रुपये दराने अंडी विकली जात आहेत. केक आणि आता हॉटेल्समध्ये अंड्यांना मागणी वाढलेली आहे. शेजारील राज्यांतून त्यांची मोठ्या प्रमाणात आयात केली जात आहे.
पणजी बाजारातील भाज्यांच्या दराच्या तुलनेत गोवा फलोत्पादन महामंडळाद्वारे विकण्यात येणाऱ्या भाजीचे दर काहीअंशी कमी असून फलोत्पादनाच्या गाळ्यांवर प्रतिकिलो टोमॅटो ५३ रुपये, बटाटे ३२ रुपये, कांदे २९ रुपये, भेंडी ६७ रुपये, कोबी ३० रुपये, गाजर ४७ रुपये दराने विकले जात आहेत.
ग्रामीण भागात लालभाजी, मुळा व इतर भाज्या पिकवल्या जात आहेत; परंतु अजून आवश्यक तेवढे पीक आलेले नाही. आता कुठे काही विक्रेते स्थानिक भाज्या विक्रीसाठी आणत असून त्यांना चांगली मागणी आहे. बाजारात सध्या अळूमाडी आणि काटेकणगी, भाजीची केळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून त्यांना मागणीदेखील वाढती आहे.
मागील सहा-सात महिन्यांपासून नारळांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असून दरही भरमसाट वाढले आहेत. राज्यात नाताळ सण सुरू असताना नारळ मिळणे कठीण होत असून मध्यम आकाराचा एक नारळ ५० रुपयांना विकला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.