पणजी: गोवा उज्ज्वला योजना ही गोमंतकीय जनतेला रक्षाबंधन आणि गणेशचतुर्थीची भेट आहे. योजनेअंतर्गत मोफत सिलिंडरसाठी अर्जांचे वाटप सुरू झाले असून, पंचायती आणि स्वयंपूर्ण मित्र हे अर्ज चार दिवसांत तालुकास्तरावरील कार्यालयात दाखल करतील. त्यानंतर ९ किंवा १० सप्टेंबरला या योजनेचे पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होतील. पहिल्या टप्प्यात सुमारे २.५० लाख कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल’’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी स्पष्ट केले.
राज्यातील घरगुती ग्राहकांसाठी प्रत्येक वर्षी तीन सिलिंडर मोफत देणाऱ्या गोवा उज्ज्वला योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हर्च्युअल पद्धतीने शुभारंभ केला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीव गडकर आणि सचिव जयंत तारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील पंचायती, नगरपालिका आणि आमदारांच्या कार्यालयांमध्ये उपस्थित नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित केले.
अर्ज १९१ पंचायतींत
‘‘गोवा उज्ज्वला योजनेचे अर्ज १९१ही पंचायतींच्या पंचांपर्यंत पोहोचवले जातील. ५ ते ८ सप्टेंबरदरम्यान हे अर्ज नागरी पुरवठा खात्याच्या तालुकास्तरावरील कार्यालयात जमा केले जातील. त्यानंतर ९ किंवा १० रोजी हे पैसे बँक खात्यात जमा होतील. योजनेसाठी उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. ही योजना महिलांसाठी सुरू केली असल्याने केवळ महिलांनीच अर्ज भरावेत’’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
योजनेसाठी दोन श्रेणी
‘‘योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. विधवा महिला तसेच वृद्धापकाळ पेन्शन, गृह आधार योजनेचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी ही श्रेणी आहे. ज्या खात्यात या योजनांचे पैसे जमा होतात, त्या बँकेचे तसेच सिलिंडरच्या पुस्तिकेच्या प्रतींसह त्यांनी अर्ज करावा. या अर्जाची पडताळणी करून आमदार, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य किंवा सचिव त्यावर स्वाक्षरी करतील..
‘‘ब श्रेणीत गृह आधार किंवा इतर पेन्शनचा लाभ घेत नसलेल्या आणि ज्या घरातील पालक किंवा सासरची मंडळी या योजनांचा लाभ घेत आहेत, परंतु सुनेला कोणताही लाभ मिळालेला नाही, अशा सुनांचा समावेश करण्यात आला आहे,’’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंचायती आजही राहणार खुल्या : अर्जांचे नागरिकांना वितरण करण्यासाठी रविवारी सर्व पंचायती स.१० ते सायं.५ या वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश सर्वच पंचायतींना दिलेले आहेत. त्यानुसार पंचायती कार्यालयीन वेळेत सुरू असतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाने शनिवारी सायंकाळी कळवले.