पणजी: पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने राज्यात जून आणि जुलै या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेत आतापर्यंत १८ हजार ४६९ रोपांची लागवड करण्यात आली आहे.
पाणथळ जागा, शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षेत्रे, शेतकरी, पंचायती, सरकारी विभाग, उद्योग तसेच महामार्ग आणि रस्त्यांच्या परिसरात ही लागवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पाणथळ जागांच्या परिसरातील वृक्षारोपणाला महत्त्व देण्यात आले आहे. चिंबल येथील पाणथळ भागात वृक्षारोपण करण्यात आले असून, हणजुणे-कायसूव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातही लागवड करण्यात आली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने म्हापसा येथील श्री गणेश विद्या मंदिरात रोपांचे वितरण करण्यात आले. तसेच खांडेपार महामार्ग परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पत्रादेवी येथील वृक्षारोपणस्थळीही कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, उपलब्ध नोंदीनुसार सध्या लागवड केलेल्या रोपांची संख्या देण्यात आली असून, रोपांच्या संगोपनासाठी किंवा त्यांच्या जगण्याचे प्रमाण किती आहे, याबाबतची माहिती या सादरीकरणात उपलब्ध नाही.
पंचायत क्षेत्रांत सर्वाधिक लागवड
उपलब्ध माहितीनुसार, वृक्षारोपणाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या मोहिमेत पंचायत क्षेत्रांनी सर्वाधिक सहभाग नोंदविला असून, तेथे ६ हजार ३२७ रोपांची लागवड करण्यात आली आहे.
पाणथळ जागांच्या परिसरात ४ हजार ५३, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात १ हजार ४४०, शाळांमध्ये १ हजार २३६ आणि शेतकऱ्यांकडे १ हजार १८१ रोपे लावण्यात आली आहेत.
शेतकरी व विविध संघटनांच्या माध्यमातून आणखी १ हजार ५०, तर महामार्ग व रस्त्यांच्या परिसरात १ हजार ८११ रोपांची लागवड करण्यात आली.सरकारी विभागांमध्ये ५९८ आणि उद्योगांच्या परिसरात ७७३ रोपे लावण्यात आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.