पणजी: परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यांतून डेंग्यू, मलेरिया घेऊन गोव्यात येत असल्याचे गेल्या काही वर्षांत उघड झाल्याने ते राज्यात येताच त्यांची डेंग्यू, मलेरिया चाचणी करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत आरोग्य सचिव यतिंद्र मराळकर यांनी तसे स्पष्ट निर्देश कामगार खात्याला दिले आहेत.
यासंदर्भात ‘गोमन्तक’शी बोलताना संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या, ‘‘पावसाळ्याच्या काळात राज्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी झालेल्या बैठकीला आरोग्य खात्यासह कामगार, मत्स्योद्योग, पंचायत तसेच शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते.
राज्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रसार प्रामुख्याने परप्रांतीय कामगारांमुळे होत असल्याचे वारंवार समोर आलेले आहे. त्यामुळे ते राज्यात दाखल होताच आरोग्य केंद्रांमध्ये त्यांची डेंग्यू, मलेरिया चाचणीचा निर्णय घेण्यात आला. कामगार खात्याने अशा कामगारांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती आरोग्य खात्याला द्यावी, अशा सूचना सचिव मराळकर यांनी कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’’
त्यानंतर मासेमारीशी संबंधित हजारो कामगार विविध राज्यांतून गोव्यात दाखल होणार आहेत. त्यांची माहिती आरोग्य खात्याला देण्यासह विविध ठिकाणच्या जेटींवर दक्षता घेण्याचे निर्देश मत्स्योद्योग खात्याला देण्यात आल्या आहेत’’, असेही महात्मे यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांत जागृती घडवा!
‘‘राज्यात यंदा डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा प्रादूर्भाव वाढू नये, असे आजार टाळण्यासाठी कशाप्रकारे काळजी घ्यावी, याबाबत आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या सूचना मराळकर यांनी शिक्षण खात्याला दिलेल्या आहेत’’, असेही डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.