

पणजी: राज्यात प्रत्येक महिन्याला डेंग्यू आणि मलेरियाचे महिन्याला सरासरी १५३ रुग्ण आढळत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. तर, गेल्या तीन वर्षांत या दोन आजारांनी सात जणांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. २०२२ पासून आतापर्यंत राज्यातील किती जणांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण झालेली आहे? पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जातात? याबाबत कशापद्धतीने जागृती केली जात आहे? असे प्रश्न आमदार शेट यांनी विचारले होते.
त्यावरील उत्तरात २०२२ पासून आतापर्यंत राज्यात डेंग्यूचे २,१६५ आणि मलेरियाचे ३,३६७ असे एकूण ५,५३२ असे रुग्ण आढळल्याचे मंत्री राणे यांनी म्हटले आहे. यावरून प्रत्येक महिन्याला या दोन्ही आजारांची लागण झालेले सरासरी १५३ रुग्ण आढळत असल्याचे दिसून येते.
या दोन आजारांमुळे २०२२ मध्ये एक, तर २०२३ आणि २०२५ मध्ये प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला. गतवर्षी मात्र या आजारांमुळे एकाचाही मृत्यू झालेला नसल्याचेही मंत्री राणे यांनी नमूद केले आहे.
जनजागृतीवर भर
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी दर पंधरा दिवसांनी गावागावांत स्वच्छता मोहीम राबवली जाते. पंचायतींच्या मदतीने पाणी साचणाऱ्या भागांची पाहणी करून तेथे डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी किटकनाशकांची फवारणी केली जाते.
डेंग्यू किंवा मलेरिया झालेल्या रुग्णांच्या घरांत तसेच आसपासच्या भागांत सर्वेक्षण केले जाते. डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्यासाठी नेमके काय करावे, याबाबतची जागृती जनतेत केली जाते, असेही मंत्री राणे यांनी उत्तरात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.