पणजी: तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीचा विषय सरकारला आता ३१ डिसेंबरच्या पुढे ढकलता येणार नाही. १ जानेवारी २०२६ ते मार्च २०२७ पर्यंत केंद्र सरकार जिल्ह्यांच्या सीमा बदलण्यास मंजुरी देणार नाही. तसेच विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२७ मध्ये होण्याची शक्यता असल्याने यंदाच तिसऱ्या जिल्ह्याबाबत सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या ३१ डिसेंबरनंतर जिल्ह्यांच्या सीमा बदलता येणार नाहीत, अशी अट लागू होत आहे. त्यामुळे गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारला या मुदतीपूर्वीच घ्यावा लागणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात आज झालेल्या सचिव, खाते प्रमुख पातळीवरील बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. सुरवातीला फोंडा हा तिसरा जिल्हा होईल, अशी चर्चा होती.
मात्र, नंतरच्या हालचालींमध्ये काणकोण, सांगे, केपे आणि धारबांदोडा या तालुक्यांचा समावेश करून केपे येथे मुख्यालय असलेला तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र या प्रस्तावाला मिश्र प्रतिसाद मिळत आहे. केपे येथे मुख्यालय असावे की नको, यावरूनही मतमतांतरे व्यक्त होत आहेत. विशेषत: काणकोण तालुक्यातील काही रहिवाशांनी आपला तालुका तिसऱ्या जिल्ह्यात समाविष्ट करू नये, अशी भूमिका घेतली आहे. राज्य सरकारवर आता ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय घेण्याचे दडपण निर्माण झाले आहे.
१ जानेवारी २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत केंद्र सरकार जिल्ह्यांच्या सीमा बदलण्यास मंजुरी देणार नाही.
फेब्रुवारी २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता.
त्यामुळे निर्णयासाठी सरकारकडे चार महिनेच शिल्लक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.