पणजी: ज्या विद्यार्थ्यांना प्रथम आणि दुसऱ्या वर्षांतील काही पेपर (बॅकलॉग) राहिले आहेत, अशा विद्यार्थ्यांना कोविड काळात काही प्रमाणात नियम शिथिल करून तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला जायचा. परंतु ही शिथिलता यंदा लागू नाही.
दोन वर्षांतील विषयाचे पेपर सोडविल्याशिवाय यंदा तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांत संभ्रम असून यंदाही नियम शिथिल करावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ, विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळांनी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन आणि कुलसचिव प्रा.धुरी यांनी केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे ‘बॅकलॉग’ राहिले आहेत त्यांना यंदा तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळणार नाही, याची माहिती विद्यार्थ्यांना नव्हती. आकस्मितपणे पूर्ववत नियम लागू करण्यात आला, त्यामुळे नवीन शिक्षण धोरणातील नियमांवर बोट ठेवत अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत.
आमचा गुणवत्तापूर्ण शिक्षणाला किंवा ‘एनईपी’ला विरोध नाही, परंतु यंदा प्रवेशविषयक नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृतीचा अभाव राहिला आहे, हे लक्षात घेऊन यंदा विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात प्रवेश द्यावा, अशी मागणी ‘अभाविप’ तथा गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे विनय राऊत यांनी सांगितले.
या विषयासंबंधी आम्ही गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांना भेटलो असता त्यांनी आम्हाला यासंबंधी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक बोलावून या प्रश्नावर कशा प्रकारे तोडगा काढता येईल त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आम्हाला खात्री आहे की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे सरकारी महाविद्यालय सांखळीचे विद्यार्थी मंडळाचे सरचिटणीस अमेय किंजवडेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.