सासष्टी: सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार स्वीकारताच गोव्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची पाहणी केली आहे. नागरिकांना सर्वोत्तम रस्ते देणे ही आपली जबाबदारी असून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते दुरुस्त करून उत्तम स्थितीत आणले जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात त्यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकली. लोकांच्या समस्या विविध प्रकारच्या आहेत; त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी वीज खात्याचा मंत्री असताना वीजपुरवठा सुरळीत केला, त्याचप्रमाणे आता उत्तम रस्ते देणे हे आपले ध्येय आहे, असे कामत म्हणाले.
पश्चिम बगल रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून कोणाचीही तक्रार असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पोर्टलवर नोंद करावी, असेही त्यांनी नमूद केले. सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत. अधिकाऱ्यांनी लोकांची कामे एका भेटीत पूर्ण करावीत, अशी सूचना कामत यांनी दिली.
गाऱ्हाणी ऐकण्यासाठी मोठ्या फौजफाट्याची गरज नाही. दोन अधिकारी असले तरी पुरेसे आहेत; मात्र ज्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे, त्यांनी तत्काळ उपस्थित राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मडगाव कदंब बसस्थानकासमोरील जागा पार्किंगसाठी विकसित करण्याचे निर्देश जीसुडाला देण्यात आले आहेत. पाच नोव्हेंबरपर्यंत या जागेच्या पार्किंग निविदा जाहीर होतील. त्यामुळे नगरपालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होईल, असे कामत म्हणाले.
परवानगीशिवाय रस्ता खोदल्यास आता फौजदारी खटला दाखल केला जाईल, रस्ता खोदायचा असल्यास मुख्य अभियंत्याकडून ‘ना हरकत दाखला’ घेणे बंधनकारक आहे, असे मंत्री दिगंबर कामत यांनी सांगतिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.