पणजी: गोव्यात सध्या दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, परतीच्या पावसाचा जोर आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे. त्यानुसार, उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये २३, २४, २५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ या काळात गडगडाटी वादळ होण्याची दाट शक्यता आहे.
विशेषतः, या काळात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि त्यांचा वेग ५० किलोमीटर प्रतितास पर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सततच्या या हवामानामुळे येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे. दिवाळीचा मुख्य दिवस उत्साहात पार पडला असला तरी, भाऊबीजेच्या मुहूर्तावर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या वादळी पावसामुळे गोव्यातील अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी विशेषतः मयेसह डिचोली परिसरात चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. या वादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली, ज्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. या नैसर्गिक आपत्तीची झळ केवळ रस्त्यांपुरती मर्यादित न राहता, नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचली. पीडित कुटुंबांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीजवाहिन्या तुटल्या आणि अनेक ठिकाणी वीज खांबांचीही मोडतोड झाली आहे. यामुळे मये आणि डिचोलीसह आसपासच्या भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता, याव्यतिरिक्त, मये भागातील बागायतींमध्येही मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने शेतकरी आणि बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले.
सणासुदीच्या काळात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले. पुढील चार दिवस हवामान खात्याचा 'यलो अलर्ट' असल्याने, नागरिकांनी आणि प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.