पणजी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांची फोंडा येथे गुरुवारी (१० एप्रिल) सकाळी झालेली तासभर चर्चा सध्या गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. भंडारी समाज भाजपपासून दुरावतो असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे दोघेही भंडारी समाजाचे प्रभावशाली नेते असून त्यांच्यातील संवादाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपने गेल्या काही काळात विविध समाजघटकांमध्ये बळकट होत असताना, भंडारी समाजामध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. गोमन्तकने गेल्या रविवारी भंडारी समाजाचे राजकारण कुस बदलत असल्याचे वृत्त दिले होते.
स्थानिक पातळीवरील काही निर्णय, उमेदवारीचे वाटप तसेच समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याची भावना यामुळे ही नाराजी भंडारी समाजात निर्माण झाली आहे, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेत कृषीमंत्री रवी नाईक यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
रवी नाईक हे गोव्याच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असून त्यांच्या भंडारी समाजात चांगल्या प्रमाणात पकड आहे. त्यामुळे समाजातील अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांच्या मदतीने संवाद आणि समन्वय वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो.
...तर नाराजीचा पक्षाला फटका!
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारी समाजाचा पाठिंबा पुन्हा मिळवण्यासाठी धोरणात्मक चर्चा झाल्याची शक्यता आहे. भाजपसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार असून समाजाचा विश्वास परत मिळवण्यासाठी पक्षाला ठोस पावले उचलावी लागतील. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो याची जाणीव झाल्यानेच ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.