युरींचा प्लॅन फसला?
कुंकळ्ळीत शुक्रवारी विविध प्रकल्पांचा पायाभरणी व उद्घाटन सोहळा भाजप सरकारने आयोजित केला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतच उपस्थित राहिले. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी होती. परंतु, निमंत्रण पत्रिकेवर नावे असूनही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, दिगंबर कामत, मायकल लोबो काही हजर राहिले नाहीत. यामुळे, चिफ्टेन स्मारकाचा शिलान्यास सरकारने घोषणा करून चार वर्षे झाली. आता प्रस्तावित आरोग्य केंद्राचे खोदकाम तरी सुरू होणार का, की शिलान्यासापुरताच प्रकल्प राहणार, अशी चर्चा उपस्थितांत सुरू झाली म्हणे. त्यातच, डॉ.प्रमोद सावंत व विश्वजीत राणेंना एकाच व्यासपीठावर आणून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणे कुंकळ्ळीकरांना युती दाखवून परत एकदा ‘नवी सुरुवात’ करणार अशी चर्चा सुरू होती. परंतु, युरींचा प्लॅन फसला व त्याला आझाद मैदान ते दोनापावला मोर्चा कारण ठरल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलू लागलेत.
पोलिसही ‘सेफ’ नाहीत!
चोरट्यांनी सध्या उच्छाद मांडला असून,पोलिसांनीही ते हिसका देऊ लागले आहेत. शुक्रवारी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात आपल्या ऑफिसियल कामासाठी आलेल्या एका पोलिसाला हा कटू अनुभव घ्यावा लागला. झाले असे त्या पोलिसांनी आपली दुचाकी पोलिसांसाठी मुख्यालयात असलेल्या पार्किंगच्या जागेत पार्क करून ठेवली होती. हेल्मेट दुचाकीवरच ठेवली होती. काम आटोपून परत आला असता, त्याला आपले हेल्मेट चोरीला गेल्याचे लक्षात आले. बिचाऱ्याने नवीन हेल्मेट विकत घेऊन नंतर आपले पोलिस ठाणे गाठले. पोलिस मुख्यालय आवारातच जर चोरी होते, तेथे सर्वसामान्यांची काय स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही ना?
पोलिसही ‘सेफ’ नाहीत!
चोरट्यांनी सध्या उच्छाद मांडला असून,पोलिसांनीही ते हिसका देऊ लागले आहेत. शुक्रवारी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात आपल्या ऑफिसियल कामासाठी आलेल्या एका पोलिसाला हा कटू अनुभव घ्यावा लागला. झाले असे त्या पोलिसांनी आपली दुचाकी पोलिसांसाठी मुख्यालयात असलेल्या पार्किंगच्या जागेत पार्क करून ठेवली होती. हेल्मेट दुचाकीवरच ठेवली होती. काम आटोपून परत आला असता, त्याला आपले हेल्मेट चोरीला गेल्याचे लक्षात आले. बिचाऱ्याने नवीन हेल्मेट विकत घेऊन नंतर आपले पोलिस ठाणे गाठले. पोलिस मुख्यालय आवारातच जर चोरी होते, तेथे सर्वसामान्यांची काय स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही ना?
खाकीची शान घालवून ही कसली ‘पुडी’ वळली?
सध्या कोलवाळ जेलमध्ये कैद्यांपेक्षा जास्त चर्चा तर गोवा पोलिसांनी सुरू आहे. अहो, ज्यांनी चोरांना पकडायचे, तेच चक्क गांजाचे ‘डिलीव्हरी बॉय’ बनले की काय? गुरुवारी एक पोलिस कॉन्स्टेबल साहेब ड्युटीवर आले खरे, पण चालताना पाय जरा जास्तच जड वाटत होते. गेटवर झडती झाली आणि काय सांगावे, साहेबांच्या सॉक्समधून गांजाचे पाकीट बाहेर आले! लोकांना वाटले साहेब कडक ड्युटी करतायत, पण साहेबांनी तर सॉक्समध्येच ‘झिंगाट’ व्हायची सोय केली होती. बाहेरच्या जगात ‘झोमॅटो’ चालते, तसे जेलमध्ये ‘खाकी सर्व्हिस’ सुरू झालीय की काय, अशीच आता चर्चा आहे. साहेबांचा हा ‘सॉक्स प्लॅन’ असा काही फसला की, रक्षकच आता भक्षक बनून कोठडीत गेलेत. गांजा तर पकडलाच, पण पोलिस खात्याची इज्जत मात्र धुळीत उडाली. आता ज्या कैद्यांसाठी माल आणला होता, त्यांच्याच शेजारी बसून साहेबांना जेलची हवा खावी लागणार. शेवटी काय, कायद्याचे हात लांब असतात म्हणतात, पण ते थेट साहेबांच्या सॉक्सपर्यंत पोहोचतील, असे कोणालाच वाटले नव्हते!
अशीही बेफिकीरी
मार्ना-शिवोली रस्त्यावर तेल वाहून नेणारा टँकर थेट कुंपण तोडून आत घुसल्याची घटना घडली, आणि पुन्हा एकदा ‘अपघात’ या गोड शब्दाखाली सगळं झाकण्याचा प्रयत्न सुरू झाला! वाहनाचा वेग, चालकाची बेफिकिरी की रस्त्यांची दयनीय अवस्था. खरं कारण काहीही असो, पण नियम पाळणं आणि अंमलबजावणी करणं या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी कोसळल्याचं चित्र यातून समोर येतं. रोज अशा घटना घडतात, थोडा गाजावाजा होतो आणि दुसऱ्या दिवशी सगळं पूर्ववत; ना कडक कारवाई, ना धडा! शेवटी प्रश्न तोच, भिंती मोडल्यावर तरी शहाणपण येणार की एखादी मोठी दुर्घटना होईपर्यंत सगळेच डोळेझाक करत राहणार?
‘ओंकार’वर ‘वनतारा’चा तोडगा?
‘ओंकार’ हत्ती हा गोवा व महाराष्ट्रातील सीमेवरच्या शेती-बागायतीची हानी करत असल्याने तेथील लोकांना अन् वन अधिकाऱ्यांना नकोसा झालाय. वास्तविक वन्य प्राण्यांचा अधिवास मानवी विकासामुळे नष्ट होतोय, ते तरी कुठं जातील. पण हा नकोसा झालेला हत्ती अन्यत्र कुठे सोडावा, या प्रश्नावर अंबानींचा ‘वनतारा’ पर्याय ठरू शकेल,असा पर्याय अनेकांना सुचू लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी जर अनंत अंबानींना फोन केला, तर ते आनंदाने ‘ओंकार’ला हळुवारपणे पकडून ‘वनतारा’त नेण्यास तयार होतील, असेही अनेकांना वाटू लागलेय. प्रयत्न करायला काय हरकत आहे, अशी विचारणा ‘ओंकार’ पीडितांकडून होतेय!
हरमलपर्यंत जंगलाची हद्द
हरमलमध्ये पुन्हा एकदा जंगलाचा कायदा चालू असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसले. बिबट्याने एका पाळीव कुत्र्याला सहज शिकार करत ओढत नेल्याची घटना समोर आली आणि आपण मात्र अजूनही ‘हे क्वचितच घडतं’ म्हणत स्वतःची समजूत काढत बसलो आहोत! गावातल्या घरांच्या उंबरठ्यापर्यंत वन्यजीव पोहोचलेत, पण खबरदारी मात्र अजूनही कागदावरच; ना योग्य प्रकाशयोजना, ना सुरक्षित कुंपण, ना प्रशासनाची ठोस हालचाल. मग अशा घटनांवर आश्चर्य व्यक्त करण्याचा दिखावा तरी कशासाठी? प्रश्न फक्त त्या बिचाऱ्या कुत्र्याचा नाही, तर उद्या हीच वेळ माणसांवर आली तर जबाबदारी कोण घेणार, याचं उत्तर मात्र नेहमीप्रमाणे सीसीटीव्हीतच अडकून राहणार का?
आग धुमसतेच आहे...
बर्च अग्निकांड... एकेकाळी राज्यभर गाजलेलं प्रकरण! त्या आगीत फक्त जळालं ते एक ठिकाण नव्हतं, तर अनेक प्रश्नही पेटले होते. त्यामुळेच लुथरा बंधू आणि सहमालक अजय गुप्ता यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. पण काय झालं...काळ गेला, आरोपी जामिनावर बाहेर आले... आणि विषय थोडा थंडावला. आता काहींना वाटत असेल की, लोक सगळं विसरले... तर हा फक्त त्यांचा गोड गैरसमज म्हणायचा! कारण लोक विसरत नाहीत, ते फक्त शांत बसतात आणि योग्य वेळी आठवणही करून देतात. शिवाय राज्यात अजूनही आगीच्या घटना घडतच आहेत, त्यामुळे ‘बर्च’चं प्रकरण लोकांच्या मनातून पूर्णपणे जाणं तितकं सोपं नाही. उलट, प्रत्येक नवीन आग लागली, की जुन्या जखमा पुन्हा चाळवल्या जातात, अन् मग लोकांच्या चर्चेत पुन्हा एकदा तेच नावं, तेच प्रश्न, आणि तीच चर्चा ऐकू येते! एकूण काय... आग विझली असली, तरी निखारे अजूनही धुमसताहेत!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.