पणजी: गोव्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ‘फसल बीमा योजने’तून (पीएमएफबीवाय) ऊसासह भुईमूग आणि कडधान्य पिकांनाही वगळण्यात आले आहे. कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. योजनेंतर्गत खरीप पिकांसाठी दोन टक्के, रब्बी पिकांसाठी १.५ टक्के आणि बागायती किंवा व्यावसायिक पिकांसाठी पाच टक्के इतका अत्यंत कमी वीमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो.
दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते. शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राखणे आणि शेतीमध्ये सातत्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली असून,
‘बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ आणि ‘ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’च्या माध्यमातून योजना राज्यात चालते. परंतु, कृषी खात्याने खरीप हंगामात राज्यात लागवड होत नसल्यामुळे कडधान्य पिके तसेच लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्याने उत्तर गोव्यातील ऊस आणि भुईमूग ही पिकेही योजनेतून वगळली.
उत्पादन घटल्याने निर्णय : देसाई
‘राज्यात कडधान्य लागवडीचे प्रमाण खूपच कमी आहे. खरीप हंगामात किती हेक्टर क्षेत्रात भुईमूगाचे उत्पादन घेतले जाते, याची आकडेवारी कृषी खात्याकडे नाही. तर, संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने उत्तर गोव्यातील उसाच्या लागवडीचे प्रमाणही कमी झालेले आहे. त्यामुळे ऊस, भूईमुगासह कडधान्य पिकांनाही प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात या पिकांचे उत्पादन लक्षात घेऊन त्यांचा योजनेत पुन्हा समावेश करण्यात येईल’, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.