

Sheikh Hasina Return Announcement Bangladesh: सुमारे दोन वर्षांपूर्वी हिंसक राजकीय उलथापालथीनंतर सत्ता सोडून भारतात आश्रय घेण्यास भाग पडलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पहिल्यांदाच मायदेशी परतण्याची मोठी घोषणा केली. नवी दिल्लीतील फॉरेन करस्पॉन्डेंट्स क्लबमध्ये आयोजित एका व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे त्यांनी बांगलादेशच्या जनतेशी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांशी संवाद साधला. या डिजिटल पत्रकार परिषदेत फक्त त्यांचा आवाज ऐकू येत होता, मात्र त्या प्रत्यक्षात स्क्रीनवर दिसत नव्हत्या. या अत्यंत संवेदनशील भाषणादरम्यान त्या अनेकदा भावूक झाल्या.
मला तुरुंगात जाण्याची किंवा जीवाला मुकण्याची अजिबात भीती वाटत नाही, मी माझ्या देशातील जनतेच्या पाठीशी उभी राहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी नक्कीच बांगलादेशात परतणार, असा खंबीर निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या संबोधनात शेख हसीना यांनी सध्याच्या बांगलादेशी नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल करत देश चुकीच्या दिशेने नेला जात असल्याचा गंभीर आरोप केला. आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिल्याचे सांगत त्यांनी अवामी लीगच्या समर्थकांना धीर दिला. याचवेळी त्यांनी भारताचे विशेष आभार मानत भारत नेहमीच बांगलादेश (Bangladesh) एक विश्वासू आणि जवळचा मित्र राहिला असल्याचे प्रतिपादन केले.
मात्र, शेख हसीना यांच्या या वक्तव्यामुळे आणि त्यांना भारतीय भूमीवरुन वक्तव्य करण्यासाठी मंच उपलब्ध करुन दिल्याने ढाका येथील नव्या सरकारचा पार चांगलाच चढला. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर अत्यंत कडक शब्दात आक्षेप नोंदवला असून, भारताचा हा निर्णय बांगलादेशच्या सार्वभौमत्वाचा थेट अपमान असल्याचे म्हटले.
बांगलादेश सरकारने अधिकृत निवेदनात म्हटले की, ज्या दिवशी देश जुलै क्रांतीचा दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्याच दिवशी हसीना यांना सार्वजनिक व्यासपीठ मिळणे हे देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांचा अवमान करणारे आहे. ढाका प्रशासनाने शेख हसीना यांना नरसंहारासाठी जबाबदार आणि फरार गुन्हेगार घोषित केले असून, 2013 च्या प्रत्यार्पण करारांतर्गत त्यांना तात्काळ ताब्यात देण्याची मागणी भारताकडे पुन्हा एकदा केली.
भारताच्या या भूमिकेमुळे दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा इशाराही ढाकाकडून देण्यात आला. तर दुसरीकडे, अवामी लीगने हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीने लावल्याचे म्हटले. या संपूर्ण वादामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये एक नवा तणाव निर्माण झाला असून, हसीना खरोखरच मायदेशी परतणार की त्यांना राजकीय आणि कायदेशीर संघर्षाला सामोरे जावे लागणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.