पेडणे: आम्हाला पेडणेत सनबर्न नकोच, असे सांगून ‘सनबर्न’ संबंधी लोकांच्या भावना लक्षात घेऊन आमदार प्रवीण आर्लेकर हे विरोधात ठाकले असून संघटित राहून पेडणे तालुक्याच्या संस्कृतीवर घाला घालण्यासाठी आलेले हे संकट नष्ट करू, असा निर्धार पेडणे मतदारसंघातील नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच व नागरिकांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बोलाविलेल्या बैठकीत केला.
‘सनबर्न’ संबंधी पुढील रणनीती ठरवण्यासाठी एक तातडीची बैठक आमदार प्रवीण आर्लेकर याच्या कार्यालयात झाली. या बैठकीत बहुतेक पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, लोकांच्या भावना व संस्कृतीच्या रक्षणासाठी मी ‘सनबर्न’ विरोधात पाऊल उचलले आहे. या माझ्या मतावर मी ठाम आहे, हीच भूमिका यापुढेही राहील.
या विषयावर खुले आम चर्चा व्हावी, त्यातून निर्णय घ्यावा या साठी सर्वांना एकत्र केले असल्याचे बैठकीच्या सुरुवातीलाच उगवेचे सरपंच सुबोध महाले यांनी सांगितले. या बैठकीत कोणावरही दबाव आणला जाणार नाही, प्रत्येकाने आपले स्पष्ट मत मांडावे ‘सनबर्न’ चे समर्थन करणाऱ्यांनी समर्थन करावे, त्यांना कोणीही दोषी ठरवणार नाही, विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा सर्वांच्या मताचा आदर करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही महाले यांनी बैठक बोलावण्याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले.
प्रकाश कांबळी म्हणाले की, भाजप व मनोहर भाई पर्रीकर यांनी अशा कार्यक्रमांना प्रखर विरोध केला होता. याचमुळे काँग्रेस (Congress) सरकार गेले.असे असताना भाजपचे सरकार असे कार्यक्रम पेडणेकरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे. ही विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात ठेवावे.
माजी जि. पं. सदस्य तुकाराम हरमलकर म्हणाले की , आमच्या धारगळ व पेडणे तालुक्यात ‘सनबर्न’ आम्हाला नको, अशी आमची मागणी आहे. आमचा पेडणे तालुका सोडून तुम्हाला पाहिजे तिथे ‘सनबर्न’ करा.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना ईडीम सारखे सनबर्न महोत्सव गोव्यात आयोजित केलेले हवे आहे. मडगावातील एका कार्यक्रमावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आज सांगितले की, गोवा हे पर्यटन स्थळ. त्यामुळे गोव्यात अनेक पर्यटक येतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे संगीत व नृत्य महोत्सव हवे आहेत. मात्र ते कुठे आयोजित करावे हा निर्णय सरकारने घ्यावा. आपण पणजीतील ‘सी फूड महोत्सव’ मांद्रेत आणलेला आहे. हा महोत्सव हरवळे समुद्र किनाऱ्यावर १३.१४ व १५ डिसेंबर रोजी होणार आहे. या महोत्सवाचे नाव मात्र बदलण्यात आले आहे. गोव्यातील (Goa) समुद्र किनाऱ्यावर जास्तीत जास्त रांपणकार समाज स्थायिक आहे. त्यामुळे रांपणकाराचो सी फूड महोत्सव असे त्यास नाव देण्यात आल्याचे आरोलकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.