वाळपई: पाली (ठाणे) सत्तरी येथील सावंतवाडा परिसरातील एका विहिरीत रविवारी सकाळी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत युवकाची ओळख दीपेश लक्ष्मण उस्तेकर (२६, रा. घोलवाडा-वेळगे, सत्तरी) अशी पटली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दीपेश हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी शनिवारी वाळपई पोलिस स्थानकात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.
रविवारी सकाळी सुमारे १०.४५ च्या सुमारास पाली येथील सावंतवाडा परिसरातील विहिरीत मृतदेह असल्याची माहिती वाळपई अग्निशमन केंद्राला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अग्निशमन जवान दत्ताराम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला.
ही बचाव मोहीम सुमारे तासाभराहून अधिक काळ चालली. त्यानंतर मृतदेह वाळपई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या मोहिमेत अरविंद देसाई, प्रसाद पोसणाईक, साईनाथ सावंत, सत्यवान गावस, रामा नाईक, कृष्णा नाईक तसेच सुटीवर असलेले संदीप गावणकर यांनी सहभाग घेतला. दीपेश उस्तेकर याचे मूळ गाव वेळगे-सत्तरी असून त्याची सासरवाडी पाली-सत्तरी येथे असल्याची माहिती मिळाली आहे.
आत्महत्या की, घातपात?
दरम्यान, हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की, त्यामागे घातपाताचा कोणता प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वाळपई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (गोमेकॉ) येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.