पणजी: गोवा राज्यात हवामान खात्याने आगामी दोन दिवसांसाठी — सोमवार (ता. २१) आणि मंगळवार (ता. २२) — ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, या आधीच रविवारी रात्री तिसवाडी, सत्तरी, सासष्टी, डिचोली आणि पेडणे या भागांत गडगडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.
अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची हालचाल विस्कळीत झाली, तर नरकासुर उत्सवाची तयारी करणाऱ्या युवकांच्या आनंदावर विरजण पडले. अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले नरकासुर पावसात भिजल्याने त्यांची सजावट आणि रंगसंगती खराब झाली.
मान्सून अधिकृतरीत्या परतल्यानंतरही राज्यात अधूनमधून पावसाच्या सरी सुरूच आहेत. दिवसाच्या वेळेस उकाडा जाणवत असतानाच संध्याकाळी किंवा रात्री पावसाचे आगमन होत असल्याने नागरिकांना दमट हवामानाचा त्रास होत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर तयार झालेल्या निम्न दाब पट्ट्यामुळे आगामी दोन दिवसांत पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील किनारपट्टीसह डोंगराळ भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे, तसेच पावसाच्या वेळी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागांत काही ठिकाणी झाडे पडल्याचे आणि वीजपुरवठा खंडित झाल्याचेही वृत्त आहे. पावसामुळे काही भागात थंडावा निर्माण झाला असला तरी दमट उकाड्याने त्रास कायम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.