म्हापसा: गेली अनेक वर्षे पावसाळ्यात सतत शेती पाण्याखाली जात असल्याने दुर्लक्षित राहिलेल्या गिरी परिसरातील १ हजार हेक्टर शेतीसाठी ‘नदी पुनरुज्जीवन प्रकल्प’ वरदान ठरणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा नदीपात्रात सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
याप्रसंगी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता सालेलकर आणि स्थानिक पंचायत सदस्य उपस्थित होते. पाहणीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी होडीतून प्रवास करत कामाचा दर्जा पडताळून पाहिला.
बस्तोडा येथून उगम पावणारी ही नदी (River) सुमारे ८ किलोमीटरचा प्रवास करून तार नदीला मिळते. नदीतील गाळ उपसणे, आवश्यकतेनुसार पात्राची रुंदी वाढवणे आणि संरक्षक बांध बांधणे अशी कामे वेगाने सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर परिसरातील शेती पुन्हा ओलिताखाली येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वर्षातून दोन पिके घेणे शक्य होईल. सुमारे ४६ कोटी रुपये खर्चून हाती घेतलेले हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यंदा पावसाळ्यापूर्वी शेती लागवडीसाठी कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प केवळ शेतीसाठीच नव्हे, तर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होईल. मात्र, नागरिकांनी नदीपात्रात कचरा टाकणे बंद करावे आणि या परिसराचे पावित्र्य राखावे.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी माहिती दिली की, गेल्या दोन वर्षांत राज्यात सुमारे १०० बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. गिरी येथील प्रकल्पामुळे जमिनीची योग्य मशागत झाल्यास दरवर्षी सुमारे २० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.