पणजी: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यभरात कोणत्याही प्रकारचे रस्ते खोदकाम करण्यास बंदी घातली आहे. १५ मे २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत किंवा पावसाळा समाप्त होईपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
विभागाच्या मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग, रस्ते व इमारती) कार्यालयाकडून हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, या कालावधीत कोणत्याही नव्या रस्ते खोदकाम परवान्यांना मंजुरी देण्यात येणार नाही.
यासंबंधी स्पष्टपणे ‘नो डिगिंग पिरियड’ जाहीर करण्यात आला आहे. जर या आदेशाचे उल्लंघन झाले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचा इशारा मुख्य अभियंत्यांनी दिला आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर खोदकाम केल्यास वाहतूक सुरळीत राहण्यात अडथळा निर्माण होतो, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सरकारने ही कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित अभियंत्यांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विभागाचे अधीक्षक अभियंते हे कार्यकारी अभियंत्यांशी समन्वय साधून काम पाहणार आहेत. तसेच या आदेशाची प्रत मुख्यमंत्री कार्यालयासही पाठविण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.