Goa Assembly Monsoon Session राज्यात दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली (डीएसएस) 2,25,649 ज्येष्ठ नागरिक लाभ घेत आहेत. मात्र, विविध कारणांसाठी या खात्याकडे आलेले सुमारे 4,083 अर्ज फेटाळून या लाभार्थ्यांना योजनेसाठी अपात्र ठरवले आहे.
त्यातील अनेक अर्जदारांचे कुटुंबीय सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत असल्याचे, तर काहींनी दिलेली माहिती अपूर्ण असल्याने ते फेटाळल्याचे लेखी उत्तर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत दिले. आमदार वेन्झी व्हिएगस यांनी या योजनेसंदर्भात प्रश्न विचारला होता.
समाज कल्याण खात्यामार्फत ही योजना राबविली जाते. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात औषधोपचार तसेच इतर साहाय्य मिळावे, यासाठी ही योजना सुरू केली आहे. ही योजना गेली 15 वर्षे गोव्याचा रहिवासी असलेला तसेच मतदार असलेल्यांनाच लागू केली होती.
एका दशकापूर्वी सुरू केलेल्या या योजनेसाठी राज्यातून आतापर्यंत २,३३,१०५ जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २,२५,६४९ लाभार्थ्यांना दरमहा २ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळते.
या योजनेसाठी अर्ज केलेल्या ३,३७३ जणांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. या लाभार्थ्यांनाही हे साहाय्य लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.
या कारणांमुळे लाभार्थी अपात्र
खात्याकडे आलेल्या अर्जांपैकी ४,०८३ जणांचे अर्ज फेटाळून त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवले आहे.
या अर्जदारांच्या कुटुंबीयांनी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचे सर्वेमध्ये आढळल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे.
पत्नी गृहआधार योजनेचा लाभ घेत असल्याची अनेक प्रकरणे आढळली आहेत.
काहींच्या पत्नींनी गृहआधार योजनेसाठी अर्ज केले असून ते मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
अर्जदारांनी जो पत्ता दिला आहे, त्या पत्त्यावर ते सर्वेवेळी आढळले नाहीत.
काही अर्जदारांनी ज्या बँकेचे खाते दिले आहे, ते सध्या चालू नाही.
काही अर्जदारांनी दिलेली माहिती परिपूर्ण नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.