Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa politics: खरी कुजबुज; विजय-मनोज युतीने लढणार?

Khari Kujbuj Political Satire: बहुजन समाजाचे नेते स्‍व. रवी नाईक यांच्‍या निधनास बारा दिवस पूर्ण झाल्‍याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा आणि फोंड्यातील पोटनिवडणुकीच्‍या विषयाची चर्चा पुन्‍हा सुरू झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

विजय-मनोज युतीने लढणार?

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करायचे असेल, तर विरोधकांनी लवकरात लवकर युती करणे आवश्‍‍यक आहे. अन्‍यथा भाजपचा विजय निश्‍चित असल्‍याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई वारंवार सांगत आहेत. जरी युती झाली तरी त्‍यात आप नसेल हे अगोदरच स्‍पष्‍ट झाले आहे. ‘आप’ला वगळून काँग्रेसच्‍या नेतृत्‍वाखाली युती करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीने जोर लावलेला आहे. परंतु, काँग्रेसकडून कोणतेही स्‍पष्‍ट संकेत नाहीत. त्यामुले काँग्रेसलाही वगळून विजय आणि आरजीचे अध्‍यक्ष मनोज परब जिल्‍हा पंचायत युतीने लढणार का? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. ∙∙∙

रितेश की वेगळा निर्णय?

बहुजन समाजाचे नेते स्‍व. रवी नाईक यांच्‍या निधनास बारा दिवस पूर्ण झाल्‍याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा आणि फोंड्यातील पोटनिवडणुकीच्‍या विषयाची चर्चा पुन्‍हा सुरू झाली आहे. मगो पक्षाने आधीच रवी नाईक यांचे ज्‍येष्‍ठ सुपुत्र रितेश नाईक यांना सर्व पक्षांनी बिनविरोध निवडून आणण्‍याचे आवाहन केले आहे. तर, रितेश यांना आताच मंत्रिपद देऊन भाजपने त्‍यांना पोटनिवडणुकीची उमेदवारी द्यावी आणि फोंड्यातून निवडून आणावे, अशी मागणी केली आहे. त्‍यातच आता भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी फोंडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्‍याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असे स्‍पष्‍ट केले. त्‍यामुळे भाजप रितेश यांना सहानुभूती दाखवणार यांच्‍यावर विश्‍‍वास दाखवणार की वेगळाच निर्णय घेणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ∙∙∙

नेमके संबोधन कुणाला?

वजन-मापच्‍या देशभरातील नियंत्रकांची राष्‍ट्रीय परिषद शनिवारी पणजीत झाली. या परिषदेत बोलताना केंद्रीय नागरी पुरवठा मंत्री प्रल्‍हाद जोशी यांनी हिंदीतून भाषण करताना केंद्रातील मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले. विकसित भारताचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी मोदी सरकार कशा पद्धतीने काम करीत आहे, यावर त्‍यांनी सखोल भाष्‍य केले. त्‍याचवेळी अनेकदा काँग्रेसवरही निशाणे साधले. त्‍यामुळे जोशी परिषदेला संबोधित करीत होते, की बिहारमधून रोजगारासाठी आलेल्‍या नागरिकांना? अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

युरीचे प्रगती पुस्तक जाहीर होणार?

प्रगती पुस्तकावरून आमदाराचे रँकिंग ठरले जाते. आमच्या आमदारांचे हे शेवटचे वर्ष. आता ज्या आमदारांना पुढील निवडणुकीत पुन्हा जनतेकडे जावे लागणार आहे. ते आमदार आता पुन्हा एकदा जनतेशी कनेक्ट होण्यासाठी कार्यरत राहणार. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव आमदारकीच्या चौथ्या वर्षी आपला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करणार असल्याचे समजते. विरोधी पक्ष नेते युरी म्हणे आपल्या मतदारांशी जाहीर कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. युरी म्हणे आपल्या वाढदिनी आपल्या कामाचे प्रगती पुस्तक मतदारांपुढे सादर करणार आहेत. आता पाहूया चार वर्षांनी युरीबाब जनतेला काय गिफ्ट देतात? ∙∙∙

वीजदरवाढीचा चांगला मुद्दा

वीजखात्याने रात्रीच्या वेळी अधिक वीज वापर केला, तर त्यावर वीस टक्के अधिभार लागू करण्याबाबत जो आदेश लागू केला आहे. त्यावर सर्व थरांतून कडाडून विरोध होत आहे. पण त्यावर बहुतेक विरोधी पक्षांनी ती दरवाढ मागे घेतली नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. पण सरकार ही वाढ रद्द करण्याची मुळीच शक्यता दिसत नाही, असे राजकीय निरीक्षकच मानतात. त्या मागील कारणही तसेच आहे. विरोधक फक्त घोषणाबाजी करतात, पण प्रत्यक्षात एकत्र कृती होत नाही. खरे म्हणजे जवळ येऊन ठेपलेल्या जिल्हा पंचायत व नंतरच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार विरोधी लोकमत तयार करणे सोपे होते, पण ती संधी विरोधी पक्षांनी दवडली आहे. ∙∙∙

...नेमकी किती डोकी!

गोव्यात विरोधी आघाडी तयार होण्याची शक्यता मावळू लागली आहे. कारण ‘आप’ने यापूर्वीच अशा आघाडीची शक्यता नाकारली आहे, तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याचे जाहीर केले आहे. पण काँग्रेसवाले गोव्यात तरी राष्ट्रवादीच्या स्थानाबाबत सवाल करत आहेत. यापूर्वी एकदा मिकी व नंतर जुजे फिलीप त्या पक्षाच्या तिकिटावर आमदार झालेले असले, तरी ते काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच. पण आज तशी स्थिती नाही. त्या पक्षाकडे आज जे नेते आहेत, त्यांची तोंडे दहा दिशांना आहेत. स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याच्या वल्गना करताना, त्या पक्षाने आपल्याकडे किती लोक आहेत, संघटनात्मक स्थिती काय आहे, त्याचे आत्मपरीक्षण करावे, असे विरोधी आघाडी व्हावी, म्हणून प्रयत्न करणारे उघडपणे म्हणत आहेत. ∙∙∙

कार्यक्षमता!

पणजी पोलिस स्थानकासमोरच दोन गटांमध्ये मोठी मारामारी झाली. त्यामुळे पोलिस निष्क्रिय होते का? अशी चर्चा सुरू झाली. लोकांमध्ये नव्हे, तर चक्क पोलिस स्थानकात अशा चर्चा ऐकू आल्या. स्थानकासमोरच असं घडणं म्हणजे पोलिसांचा ‘धाक’ संपला आहे आणि ‘गँग्स’ना आता पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असेच म्हणावे लागेल. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरचा हा प्रश्न असल्याने ‘एफआयआर’ तर नोंद झाली, पण जे पोलिस यावेळी उपस्थित होते, त्यांची चूक आहे की नाही? हे कोण शोधणार?∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; 'त्या' भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद!

Goa Live News: गोव्याच्या डॉ. अंजनेय कामतची भरारी! NEET-PG 2025 मध्ये राज्याचा प्रथम क्रमांक

IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

Education: भारतीय विद्यार्थ्यांचा कल करिअर केंद्रित शिक्षणाकडे, लंडनमधील विद्यापीठाचा परदेशातील शिक्षणाबाबत अहवाल

SCROLL FOR NEXT