पणजी: घरगुती विजेचा सर्वाधिक वापर हा रात्रीच्या वेळेत होतो. यावेळेतील वीज वापरावर निर्बंध आणण्यासाठी राज्याच्या वीज खात्याने उपाय शोधला असला तरी तो ग्राहकांना आर्थिक भुर्दंड घालणारा आहे.
वीज खात्याकडून आता सायंकाळी ५ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २० टक्के अधिक कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे. मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत नियमित दर तर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दराच्या केवळ ८० टक्केच दर आकारणी करण्यात येणार आहे.
राज्यात २०२५-२६ साठी वीज दरवाढीची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. त्यात वीज खात्याने घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, सरकारी तसेच सार्वजनिक उपक्रमांसाठी वेगवेगळ्या श्रेणीनुसार दरवाढ लागू केली आहे.
या वीज दरवाढीवरून विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवला असून थकीत वीज बिलाची रक्कम वसूल करा, मगच दरवाढ लागू करा, अशी मागणी केली आहे. या मागणीकडे सरकारने फारसे गांभीर्याने न पाहता उलट जाहीर केलेली दरवाढ लागू केली.
तसेच सायंकाळी ५ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत अधिक वीज वापरणाऱ्यांना २० टक्के अधिक कर लावण्याची योजना आखली आहे.
यासदंर्भात, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी वीज मंत्र्यांनी जाहीर केलेल्या सवलत आणि करावर टीका केली आहे. त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी गोव्यात संध्याकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंतच्या वेळात वीज वापरा, २० टक्के जास्त शुल्क भरा.
पीक अवर्स : कुटुंबासाठी वेळ, अभ्यासासाठी वेळ, जेवणाची वेळ. यावरून जो उत्तम तर्क लावला आहे, त्यासाठी ‘पॉवरफूल मंत्र्याचे’ कौतुक, असे नमूद केले आहे.
दरम्यान, वीज खात्याच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक वीज वापराची वेळ साधारणपणे संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत असते. या काळात घरगुती तसेच व्यापारी ठिकाणांचा वापर झपाट्याने वाढतो. त्यामध्ये प्रकाशयंत्रणा, वातानुकूलन, स्वयंपाक उपकरणे आणि टीव्ही आदींचा मोठा वाटा असतो. कमी वीज वापराची वेळ साधारण रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत असते. या वेळी वापर तुलनेने कमी असल्याने वीजपुरवठ्यावर ताण कमी होतो.
१. ढवळीकरांनी नव्या योजनेविषयी प्रसारमाध्यमांना सांगितले की, कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना बिलामध्ये २० टक्के सवलत मिळणार आहे. सवलतीचा हा प्रस्ताव आधीच वीज विभागाकडे सादर करण्यात आला आहे. सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत विजेचा कमीत कमी वापर करणाऱ्यांना २० टक्के सवलत आणि सायंंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत अधिकतर वीज वापरणाऱ्यांना २० टक्के अधिक कर लावला जाणार आहे.
२. ढवळीकर म्हणाले, वीज खात्याने हे दोन्ही प्रस्तावांवर अभ्यास करूनच निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबरपासून हे नियम लागू होतील. हा उपक्रम सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. सायंकाळी विनाकारण वीज दिवे चालू ठेवणारे लोक दिवे बंद करतील. त्याशिवाय त्यांना वीज कपात करण्याची सवयही लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांत वातानुकूलीत यंत्रणेचा वापर होतो, त्यामुळे विजेचाही वापर अधिक होतो. वीज सवलत देण्याविषयी आम्ही दोन वर्षे अभ्यास केला आहे.
राज्य सरकारचा वीज दरात २० टक्के वाढ करण्याच्या निर्णयाचे गोवा प्रदेश काँग्रेस समितीने निषेध केला आहे. सायंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत वीज वापरावर २० टक्के जादा कर आकारणी ही गोमंतकीय जनतेची उघडपणे लूटमार आहे. या निर्णयाचा फटका घरगुती वापरकर्ते, विद्यार्थी, छोटे दुकानदार आणि उद्योगधंदे यांना बसणार आहे. जनतेला दिलासा देण्याऐवजी, राज्यातील भाजपच्या सरकारने जनतेला आपल्या अपयशाची शिक्षा देण्याचा मार्ग निवडला आहे. सरकारने हा अत्याचारी व अन्यायकारक २० टक्के दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
विजेचा वापर सायंकाळपासून रात्रीचा अधिक होतो. घरात एकत्र कुटुंब असल्यानंतर वीज अधिक वापरली जाते. सहकुटुंब जेवणे, टीव्ही पाहणे, मुलांचा अभ्यास या बाबी विजेवरच अवलंबून आहेत. परंतु या सर्व गोष्टी आता मेणबत्ती किंवा तेल दिवे लावून कराव्यात, असे सरकारला सुचवावेसे वाटत तर नाही ना? कारण विजेचा अधिक वापर केल्यास २० टक्के अधिक कर लावण्याचा क्रूर निर्णय असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले.
राज्यातील भाजप सरकार वीज खात्याची थकबाकी असलेली ६०० कोटींवरील रक्कम वसुलीसाठी काहीच पावले उचलताना दिसत नाही. मात्र, गोमंतकीय सामान्यांच्या डोक्यावर दरवाढीची तलवार ठेवून त्यांना लुटत आहे, असेच या योजनेवरून स्पष्ट होते. हे सरकार सामान्यांसाठी नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.आमदार वीरेश बोरकर, आरजीपी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.