पणजी: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील वाळूचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असून त्याच्या नियंत्रणासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता राज्याने दीर्घकालीन ‘सामान्य किनारी क्षेत्र व्यवस्थापन धोरण’ तयार आखण्याची गरज आहे, असे नेदरलँड्समधील डेल्टारेस संस्थेचे तटीय भूआकारशास्त्र तज्ज्ञ बास ह्युसमन यांनी पर्यावरण खात्याला पाठवलेल्या ईमेलमध्ये सूचविले आहे.
भारतामधील संशोधकांशी सल्लामसलत केल्यानंतर ह्युसमन यांनी गोव्याच्या प्रमुख किनाऱ्यांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या मते, सध्या हणजुणे, वेळसाव आणि माजोर्डा ते केळशी या किनाऱ्यांवर लहान ते मध्यम स्तरावरील धूप दिसून येत आहे. हणजुणे येथे समुद्रकिनारा अतिशय अरुंद झाल्याने धूप जाणवते, तर वेळसाव आणि दक्षिण गोव्याच्या माजोर्डा-केळशी पट्ट्यात काही प्रमाणात मागे सरकण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ह्युसमन यांनी नमूद केले आहे की, सध्या आढळणारा धूपदर अतिशय कमी असल्याने केवळ उपग्रह चित्रांच्या आधारे वेगळा अंदाज लावणे शक्य नाही. त्यासाठी मैदानी मोजमापे आणि प्रत्यक्ष निरीक्षणे आवश्यक आहेत. तथापि, त्यांनी इशारा दिला की, ‘सध्या धूप कमी असली तरी काळाच्या ओघात वाळूचा हळूहळू होणारा ऱ्हास भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे आत्ताच तयारी आवश्यक आहे.’
डेल्टारेसचे तटीय व्यवस्थापन तज्ज्ञ पीटर-कून टोनॉन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ह्युसमन यांनी सुचवले, की गोव्याने केवळ एकच ‘पायलट सॅन्ड नॉरिशमेंट’ प्रकल्प राबवण्यापेक्षा संपूर्ण किनारपट्टीचा अभ्यास करून समग्र तटीय व्यवस्थापन धोरण आखावे. सध्या पथदर्शी प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले असले तरी त्याला भविष्योन्मुख किनारी व्यवस्थापनाच्या व्यापक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.
किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी सॅण्ड मोटार तंत्रज्ञान हे नेदरलँड्समध्ये विकसित केलेले अभिनव किनारा संरक्षण तंत्र गोव्याला देऊ करण्यात आले आहे. ज्याचा उद्देश समुद्रकिनाऱ्यावरील धूप कमी करणे आणि किनारपट्टीचे नैसर्गिक पुनरुज्जीवन घडवून आणणे हा आहे.
या पद्धतीत एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू टाकून (साधारणतः लाखो घनमीटर) कृत्रिम वाळूचा द्वीप किंवा फुगा तयार केला जातो. नंतर समुद्राच्या लाटा, भरती–ओहोटी आणि वाऱ्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे ही वाळू हळूहळू आसपासच्या किनाऱ्यांवर पसरते. अशा प्रकारे किनाऱ्यांचे संरक्षण मानवनिर्मित उपायांपेक्षा निसर्गाच्या शक्तींच्या साहाय्याने साधले जाते.
गोव्याच्या प्रत्येक किनारपट्टी विभागासाठी वाळूची गरज व उपलब्धता तपासणे (डेटा, मॉडेल आणि हवामान अंदाजांच्या आधारे).
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेमार्फत ऑफशोअर वाळू साठे व त्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण.
किनारपट्टीच्या स्थितीचे वार्षिक मोजमाप करून कृतीसाठी आवश्यक मर्यादा निश्चित करणे.
आवश्यकतेनुसार वाळू पूरकता उपाययोजना आणि त्यांचे परिणाम तपासणे.
सामाजिक व आर्थिक लाभ-तोटा विश्लेषणासाठी सर्वेक्षण
किनारी व्यवस्थापनासाठी गोव्यात संस्थात्मक व शासकीय रचना स्थापन करण्याबाबत शिफारस.
जागतिक बँकसारख्या वित्तपुरवठादार संस्थांना चर्चेत सहभागी करून प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीसाठी सहकार्य मिळवणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.