पणजी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मगो’ पक्षाने १२ मतदारसंघांत सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली असताना भाजपने या हालचालींवर सध्या मौन बाळगणे पसंत केले आहे. ‘मगो’च्या सर्वेक्षणाच्या निकालांवर प्रतिक्रिया देऊन पक्षाला अनावश्यक महत्त्व देण्यापेक्षा योग्य वेळीच त्याला उत्तर देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
निवडणुकीपूर्वी संभाव्य जागावाटपाबाबत चर्चा सुरू होण्याआधी कोणतीही जाहीर भूमिका घेऊ नये, अशा सूचना भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ‘मगो’ने फोंडा मतदारसंघात केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करताना आपण या मतदारसंघात आघाडीवर असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रतिनिधित्व करीत असलेल्या साखळी मतदारसंघासह अन्य मतदारसंघांतही ‘मगो’ सर्वेक्षण करणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे सत्तेतील दोन्ही घटक पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांच्या दाव्यांवरून वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे फोंडा हा भाजपचा पारंपरिक प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. भाजपचे दिवंगत आमदार रवी नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अशा मतदारसंघावर ‘मगो’ने थेट दावा करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने भाजपच्या गोटातही या हालचालीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. मात्र, त्यावर तातडीने प्रतिक्रिया देऊन ‘मगो’ला राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याची भाजपची तयारी नसल्याचे दिसून येते.
‘मगो’ सध्या भाजपसोबत राज्यातील सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे सत्तेतील सहकारी पक्षानेच भाजपच्या विद्यमान किंवा प्रभावक्षेत्रातील मतदारसंघांवर दावा करण्यास सुरवात केल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. ‘मगो’च्या सर्वेक्षणातून पक्षाची ताकद तपासण्याबरोबरच संभाव्य जागावाटपाच्या चर्चेत आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याची राजकीय चर्चा आहे.
‘मगो’च्या सध्याच्या हालचालींवर भाजपची बारीक नजर असून, पक्षातील नेत्यांना मात्र जाहीर प्रतिक्रिया टाळण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे ‘मगो’ने आणखी कितीही मतदारसंघांचे सर्वेक्षण करून निकाल जाहीर केले, तरी भाजपकडून सध्या त्यावर थेट प्रतिक्रिया येण्याची शक्यता कमी आहे.
विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. त्यावेळी भाजप आपल्या संघटनात्मक ताकदीचा, विद्यमान आमदारांचा, मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आणि निवडणूक निकालांचा आधार घेत भूमिका मांडणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाच्या निकालांपेक्षा प्रत्यक्ष चर्चेच्या टेबलावर कोणता पक्ष किती जागांवर दावा करतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
साखळीचा निकाल जाहीर करणार?
भाजपच्या या संयमी भूमिकेमुळे ‘मगो’च्या पुढील हालचालींकडे आता अधिक उत्सुकतेने पाहिले जात आहे. फोंड्यानंतर साखळी आणि अन्य मतदारसंघांत ‘मगो’चे सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचे निकाल जाहीर केले जातात का? आणि त्या आधारे पक्ष आपले दावे अधिक आक्रमकपणे मांडतो का? यावर आगामी राजकीय समीकरणांची दिशा काही प्रमाणात स्पष्ट होणार आहे.
मगो’ने सर्वेक्षण किंवा आणखी काय करावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. विधानसभा निवडणुकीआधी चर्चेवेळी आम्ही आमची भूमिका मांडू.
- दामोदर नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.