कुंकळळी, यंदा बारावीचा गेल्या दहा वर्षांतील निचांकी निकाल यंदा लागला असून निकालाची कारणमिमांसा सुरू झाली आहे. काही शिक्षक या निकालाचे खापर पालकांवर व आठवी पर्यंत ‘नो फेल्युअर पॉलिसी’वर फोडतात.
मुलांचे पालक जास्त लाड करतात, मुले ‘मोबाईल ॲडिक्टेड’ झाल्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. शिवाय मुलांची एका जागेवर बसण्याची व स्मरण ठेवण्याची क्षमता कमी झाल्याचा दावा काहींनी केला.
.‘कोविड’ मुळे मुलांमधील स्थिरता कमी झाली असून उद्या काय होणार याची शास्वती नसल्यामुळे मुले अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत, असाही सूर काही तज्ज्ञांनी व्यक्त केला सांगतात.
बारावीचा निकाल अल्पावधीत आणि प्रथम जाहीर करण्याची किमया गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने साध्य केली, हे आपण मान्य करावे लागेल. मात्र, कमी वेळात निकाल जाहीर केला आणि बारावीचा निकाल कमी का लागला, यावर आता चर्चा होऊ लागली आहे.
गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये म्हणतात, त्यानुसार मुलांकडून मोबाईल वापर वाढला, हे निकाल कमी लागण्याचे कारण आहे का? बारावीच्या मुलांनी दहावी परीक्षा ‘कोविड’ मध्ये दिली होती व त्यांचे नुकसान झाले होते, म्हणून निकाल कमी लागला का?,असे प्रश्न चर्चेत आहेत.
संबंधित घटकांची चर्चा अपेक्षित
बारावीचा निकाल कमी का लागला, यावर आम्ही काही पालक व शिक्षकांशी चर्चा केली असता वेगवेगळी मते ऐकायला मिळाली. शिक्षक आपल्या कामाला योग्य न्याय देत नसल्याचा दावा काही पालक करतात. शिक्षकांना अकाऊंटेबिलिटी का नाही? कमी निकाल लागला त्याला शिक्षक जबाबदार नाहीत का?अशी संतप्त प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.
कमी निकालास एकच कारण नसून अनेक कारणे आहेत. यावर चर्चा सुरू झाली ते योग्य झाले. पुढच्या वर्षा पासून आपण नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करणार आहोत. अनेक नवीन बदल शिक्षणात अपेक्षित आहेत. आपण कुठे चुकतो, हे एकदा सर्व संबंधितांनी एकत्र बसून तोडगा काढायला हवा,अशी अपेक्षाही काही शिक्षक, तज्ज्ञांनी व्यक्त केली.
कमी निकाल लागला म्हणजे दर्जा हीन निकाल लागला असेही नाही. कदाचित गेल्या काही वर्षा पासून आपल्याला नव्वद टक्क्यांवर निकाल ऐकण्याची सवय झाली होती, म्हणून हा निकाल कमी वाटणे स्वाभाविक आहे.
यंदा गोवा शालांन्त मंडळाने फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत एकूण १७,५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्या पैकी १४,८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केवळ २६२९ विद्यार्थी नापास झाले. बहुतांश विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत नापास झाले आहेत.
निकालावर नजर टाकल्यास कमी निकाल लागला म्हणणे धाडसाचे ठरेल. कला शाखेचा निकाल ८६.३३ टक्के, वाणिज्य शाखा ९०.७८, विज्ञान शाखा ८२.४१ तर व्यावसायिक शाखा ७६.४४ टक्के निकाल लागला आहे हा निकाल कमी म्हणता येणार नाही, हा निकाल उत्तम असल्याचे मत अनेक पालक व शिक्षकांनी तसेच काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.