मडगाव: ईडीअधिकारी असल्याचे भासवून बड्डे येथील व्यावसायिक अशोक कुमार याचे अपहरण करून १६ लाखांची लूट प्रकरणी मुख्य सूत्रधार बलराम बाबू करिशेट्टी (वय ४१) याचा अटकपूर्व जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळून लावला.
दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयासमोर हा अर्ज सुनावणीस आला असता तो नामंजूर करण्यात आला.
माकाझन येथून २४ मार्च रोजी वरील अपहरण झाले होते. बलराम करिशेट्टी याने आर्थिक वादातून अपहरणाचा कट रचला होता. त्याने त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अकोला येथील नीलेश जाधव याची मदत घेतली होती.
अशोक कुमार याला सुरवातीला ९ मार्च रोजी कारवार येथे नेऊन ईडी अधिकारी असल्याचे सांगून त्याच्या मुलावर कारवाई करण्याची आणि बँक खाती गोठवण्याची धमकी दिली होती. यावेळी आरटीजीएस आणि रोख स्वरूपात त्याच्याकडून ११ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आले होते.
त्यानंतर पुन्हा २४ मार्च रोजी माकाझन येथील कॅनरा बँकेबाहेरून संशयितांनी अशोक कुमार यांचे त्यांच्याच गाडीतून अपहरण करत कारवार येथे नेले होते. जीवे मारण्याची धमकी देत गाडीतील ३ लाख रुपये लुटले. या संपूर्ण प्रकरणात एकूण १६ लाख रुपयांची खंडणी आणि लूट झाली होती.
बलराम याच्या वकिलाने युक्तिवाद केला की, सहआरोपी नीलेश जाधव याला नियमित जामीन मिळाला आहे, त्यामुळे आपल्या अशिलालाही जामीन मिळावा. मात्र, संशयित नीलेश जाधवने ४५ दिवस कोठडीत घालवले असून त्याचा तपास पूर्ण झाला आहे.
बलराम अद्याप पसार असल्याने त्याला जामीन दिला जाऊ शकत नाही असे स्पष्ट करून न्यायालयाने बलराम करिशेट्टी याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.