पणजी: दृष्टी मरीनचे जीवरक्षक हे केवळ किनाऱ्यावर उभे असलेले कर्मचारी नसून गरजेच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणारे खरे ‘नायक’ आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शनिवार आणि रविवार हे दिवस गोव्याच्या किनारपट्टीसाठी अत्यंत धकाधकीचे ठरले असून या दिवसांत एकूण आठ जणांना बुडण्याच्या थरावरून परत आणण्यात जीवरक्षकांनी यश मिळवले, त्यातील अनेक घटनांमध्ये क्षणाचाही विलंब झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता.
पाळोळे किनाऱ्यावर कर्नाटकातील कारवार आणि बेंगळुरू येथून आलेले दोन कायकर्स समुद्रात खेळत असताना अचानक त्यांच्या कायक उलटल्या. दोघेही मदतीसाठी आरडाओरड करत असताना, जीवरक्षक परशुराम तारी यांनी जेटस्कीच्या साहाय्याने दोघांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले.
मांद्रे (Mandrem), हणजूण आणि इतर ठिकाणीही जीवरक्षकांनी बचावकार्य केले. मांद्रे किनाऱ्यावर दोन रशियन महिला पाण्याच्या प्रवाहात अडकल्या होत्या, त्यांना सुरेश, अना आणि विक्रम टालकर या तिघांनी एकत्रित प्रयत्नांनी वाचवले. हणजूण येथे पोहता न येणारे दोन पर्यटक, तर आगोंदा येथे इस्रायली दोन लहान मुले आणि एक तरुण यांचा जीव धोक्यात होता, परंतु योग्य वेळी हस्तक्षेप करून त्यांना देखील वाचविण्यात आले.
बागा आणि बायणा किनाऱ्यावर हरवलेली तीन मुलेही जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचली. बागा येथे पाच वर्षाचा मुलगा जवळजवळ हरवलेलाच होता, मात्र जीवरक्षक ऑस्कर यांनी त्याला वेळेवर शोधून काढले. दृष्टी मरीनच्या या जीवरक्षकांनी केवळ जीव वाचवले नाहीत, तर पर्यटकांच्या (Tourists) आणि स्थानिकांच्या मनात सुरक्षेचा विश्वासही निर्माण केला. त्यांच्या या कामगिरीमुळे गोव्यातील समुद्रकिनारे केवळ सुंदरच नव्हे, तर सुरक्षितही वाटू लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.