‘जो जिता वही सिकंदर’, असे म्हणतात. खरे मात्र राजकीय आखाड्यात हे गणित चालत नाही. येणाऱ्या नगरपालिका निवडणुका पक्ष पातळीवर होणार नाही, हे निश्चित झाले आहे, असे असले तरी विद्यमान आमदार युरी आलेमाव पालिका निवडणुकीत आपले स्वतंत्र पॅनल उतरविणार की आपल्या समर्थकांना बाहेरून पाठिंबा देणार? जो जिंकणार तो आपला हा फॉर्म्युला स्वीकारणार? याबाबत अजून स्पष्टता नाही. भाजपाचे पॅनल तयार करण्यासाठी सत्ताधारी असूनही भाजपकडे कुंकळळीत योग्य नेतृत्वच नसल्यामुळे भाजपा पालिका निवडणुकीत पॅनल उतरविण्याचा धोका पत्करणार नाही, हे निश्चित. युरी आलेमाव यांच्या गोटात तर अनेक इच्छुक आहेत. युरी यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या पैकी तीन महिला पालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावणार असल्याचे सांगण्यात येते.सद्या पालिकेवर युरी समर्थक नगरसेवकांची एकतर्फी सत्ता आहे पुढच्या वेळी युरी पालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यात आता पासूनच प्रयास करीत असल्याचे चित्र दिसते. युरी आलेमाव यांना पालिका निवडणुकीत कुंकळळीत वॉकओवर मिळाले नाही म्हणजे झाले. ∙∙∙
हल्लीच्या दिवसात कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. शनिवारी कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीत कचरा टाकलेल्या ठिकाणी कचऱ्याने पेट घेतला. मोठ्या प्रमाणात येथे कचरा साठवून ठेवला होता. आग विझविताना अग्नीशमन दलाच्या नाकीनऊ आले. ही आग मुद्दामहून कुणीतरी लावली असावी, असा संशय आहे. पण ती कोणी लावली हा प्रश्न आहे. आतापर्यंत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र आग लावणारा कोणी सापडत नाही. पोलिस घटनास्थळी येऊन पंचनामा करून केवळ आपले कायदेशीर सोपस्कार पार पाडतात एवढेच. ∙∙∙
जागतिक महिलादिनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चाळीस वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्याबाबत केलेल्या घोषणेमुळे महिला वर्ग भाजप सरकारवर खूष झाल्याचे सध्याचे वातावरण आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात महिलांसाठी बसप्रवास फुकट केला गेला होता, त्याच धर्तीवर तर सरकारने ही घोषणा केलेली नाही ना? असा प्रश्न केला जात आहे. कारण गोव्यात म्हणे विद्यार्थी व ज्येष्ठांसाठी पन्नास टक्के बस सवलत असल्याने सरकारी मालकीच्या कदंबचे कंबरडे मोडते. तशातच महिलांना मोफत प्रवास केला, तर ते महामंडळ आणखी तग धरणार नाही, म्हणून कदाचित सरकार त्या वाटेला गेलेले नसावे. पण मुद्दा तो नाहीच, सरकारी दवाखान्यात व रुग्णालयांतील उपचार व तपासण्या या मोफतच आहेत. मग आता केलेली ‘चेक बाय दोतोर’ ही महिलांसाठीची घोषणा म्हणजे नेमकी काय? भानगड अशी विचारणा जो तो करताना दिसू लागला आहे. ∙∙∙
मीराबागला धरणे-उपोषण-मशाल मिरवणूक झाल्यानंतर शुक्रवारी आंदोलनकर्ते लोहिया मैदानावर व विधानसभा प्रेक्षक गॅलरीतही पोहचले. मीराबागला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर दोनदा गेले. दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, सावियो डिसिल्वा, अर्चित नाईक यांनीही हजेरी लावली. त्यानंतर लोहिया मैदान व मडगाव पोलीस स्टेशनवरही हे सर्वजण हजर होते. पाटकर तर पहाटे ३ वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांबरोबर होते. मात्र कॉंग्रेसचे आमदार मात्र कुठेच दिसले नाहीत. विधानसभेतही शुक्रवारी मीराबाग प्रश्नावर त्यांची आक्रमकता नव्हती. मात्र, रविवारी युरी यांनी चक्क मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी आंदोलकांचे भेट घेऊन चर्चा करावी, असे आवाहन केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते केवळ आवाहनच करणार का? की कधीतरी रस्त्यावर उतरणार, असा प्रश्न विचारून मीराबागवासीयांनी िवचारत आहेत.∙∙∙
गेल्या अकरा वर्षांत म्हणे ४८ सरकारी शाळांचे जवळच्या शाळांत विलीनीकरण केले गेले, तर याच काळात १७८ सरकारी शाळा बंद केल्या गेल्या. सरकारनेच ही माहिती विधानसभेत दिली आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने ही पावले उचलणे सरकारला भाग पडले आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व शाळा देशी भाषेतील आहेत. यावर आता भाषा सुरक्षा मंच काय भूमिका घेतो, तेही पहाणे भाग आहे. ही वस्तुस्थिती असतानाही सरकार सरकारी शाळांच्या दुरुस्ती व डागडुजीवर वर्षाकाठी काही कोटी खर्च करते. कारण यातील अनेक शाळांत मतदान केंद्रे चालतात, असे सांगितले जात असले, तरी खरे कारण त्यांतून कंत्राटदारांचा व्यवसाय चालतो, ही अंदरकी बात आहे, असे म्हटले जाते. सरकारी शाळांची ही अवस्था असली, तरी दुसरीकडे खासगी शाळांची मात्र दिवसेंदिवस सर्वच बाबतील सुगी चालते, असे दिसून येते. सरकार ज्या पध्दतीने खासगी विद्यापीठांसाठी पायघड्या घालत आहे, ते पाहिले तर नजीकच्या भविष्यात गोवा विद्यापीठाची सुध्दा हीच अवस्था होऊ शकते, असे शिक्षण क्षेत्रांतील जाणकार म्हणू लागले आहेत. ∙∙∙
वाढलेल्या इंधन गॅस दरवाढीमुळे परवा महिला काँग्रेसने निदर्शने केली. प्रतिमा मॅडमसारख्या महिला काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अशा प्रसंगी केलेली निदर्शने लोकांना भलतीच पसंत पडली होती. परवाच्या प्रसंगी या महिलांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी म्हणे डोक्यावर लाकडाची मोळीही बांधून आणली होती. ती पाहून अनेकांना गोव्यात सरपणावर पेटणाऱ्या चुलींची आठवण झाली. पण मोदी सरकारने सुरू केलेल्या मोफत गॅस योजनेमुळे ग्रामीणच नव्हे, तर दुर्गम भागांत सुध्दा लोक चुलीवर नव्हे, तर गॅसवर स्वयंपाक करतात. पण मुद्दा तो नाही, तर गोव्यात सध्या विविध मुद्द्यांवर निदर्शने वा आंदोलने करणाऱ्यांविरुध्द ज्या पध्दतीने गुन्हे नोंदविले जात आहेत, ते पहाता सदर लाकडाची मोळी प्रकरणात बेकायदा लाकूडतोडीच्या कलमाखाली गुन्हा नोंदविला तर जाणार नाही ना? अशी चर्चा काँग्रेस वर्तुळातच सुरू होती. ∙∙∙
मिराबाग आंदोलकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात येऊन केलेल्या नारेबाजीला आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई जबाबदार असल्याचा दावा करीत, त्यांनी २४ तासांत माफी मागावी, असे निर्देश सभापती गणेश गावकर यांनी सोमवारी दिले. परंतु, विजय सरदेसाईंनी आम्हाला सभागृहात येण्यासाठी केवळ पास दिलेले होते. आमच्या आंदोलनाची त्यांना माहितीच नव्हती, असे खुद्द आंदोलकांनीच दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केलेले होते. तरीही सभापतींनी यात विजयना जबाबदार का ठरवले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ∙∙∙
२०२२ मध्ये राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आत्तापर्यंत जितकी अधिवेशने झाली, त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यात पहिले पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरूंवरून घमासान झाले नाही, असे एकही अधिवेशन झाले नाही. प्रत्येकवेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना नेहरूच कसे जबाबदार होते? हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु, सोमवारी मात्र युरींनीच नेहरूंचा विषय काढून मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण, मुख्यमंत्र्यांनी हा विषय न वाढवल्याने निवडणूक वर्षात केवळ जनतेच्या प्रश्नांवरच बोलायचे असे मुख्यमंत्र्यांनी ठरवलेले आहे का? अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांत सुरू आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.