डिचोली: व्हाळशी येथील नैसर्गिक तळ्यात तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा मगरींचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. तळ्यात तीन ते चार मगरी संचार करत आहेत.
या मगरींकडून कुत्रे व इतर लहान प्राण्यांवर हल्ले होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, भरवस्तीत असलेल्या या तळ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी २०२४च्या जून महिन्यात वन विभागाने या तळ्यातील एका मगरीला पकडले होते. त्यानंतर काही काळ तळ्यात मगरी दिसल्या नव्हत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वावर सुरू आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारच्या वेळी या मगरी तळ्याच्या काठावर उन्हात पडून राहताना दिसतात. कुणाची चाहूल लागताच त्या तातडीने पाण्यात शिरतात. तळ्याकाठी येणाऱ्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांवरही त्या हल्ला करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तळ्याचा वापर परिसरातील महिला कपडे धुण्यासाठी करतात. तसेच तळ्यालगतच्या देवस्थानाच्या मंडपात लहान मुले खेळत असतात. त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन वर्षांपूर्वी पकडली होती मगर
व्हाळशी येथील याच तळ्यात यापूर्वीही एका मगरीने दहशत निर्माण केली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाने २०२४ मध्ये विशेष मोहीम राबवून त्या मगरीला पकडले होते. त्यानंतर तळे सुरक्षित झाल्याचे मानले जात होते. मात्र, आता पुन्हा तीन ते चार मगरी दिसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या चिंतेत भर
तळ्यात तीन ते चार मगरींचा वावर.
कुत्रे व इतर लहान प्राण्यांवर हल्ले.
तळ्याकाठी महिला, शाळकरी मुले आणि नागरिकांची नियमित ये-जा.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.